राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या दिल्ली येथील १० जनपथ या निवासस्थानी भेटीसाठी पोहचले आहेत. या दोघांमध्ये गेल्या ४५ मिनिटांपेक्षा जास्त काळ चर्चा सुरु होती. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कधीही लागू शकते. त्याच संदर्भात सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करण्यासाठी शरद पवार दिल्ली या ठिकाणी गेले असल्याची चर्चा आहे. या दोघांमध्ये महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत काय करायचं याबाबत चर्चा झाल्याचं समजतं आहे.

 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना भाजपाने आस्मान दाखवलं. आता विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेला कशी टक्कर द्यायची याबाबत या दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं समजतं आहे. ४५ मिनिटांपेक्षा जास्त काळ या दोन नेत्यांमध्ये चर्चा सुरु होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातले अनेक काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते पक्षाची साथ सोडून भाजपा किंवा शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसण्याची चिन्हं आहेत. या सगळ्या परिस्थितीत निवडणूक, रणनीती या दोन्ही याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं समजतं आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाची नामुष्की सहन करावी लागली होती. तसंच राष्ट्रवादीलाही पराभवाचा सामना करावा लागला होता. आता महाराष्ट्रात काही नवी खेळी खेळायची असेल तर त्यासाठी काय काय पर्याय असतील? यावर या दोघांमध्ये चर्चा झाल्याचंही समजतं आहे.