राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार निशाणा साधला आहे. आत्महत्या करण्याची वेळ आणणाऱ्यांना हटवण्याची जबाबदारी आपली आहे. आपण सर्वजण एकत्र येऊन २०२४ मध्ये सत्ता बदल घडवू, असं विधान शरद पवार यांनी केलं आहे. ते हरियाणात विरोधी पक्ष नेत्यांच्या एका कार्यक्रमात बोलत होते.

खरं तर, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्ष नेत्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. देशाचे माजी उपपंतप्रधान चौधरी देवी लाल यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त हरियाणामध्ये अनेक विरोधी पक्षाचे नेते एकत्र आले होते. आयएनएलडी पक्षाचे अध्यक्ष ओपी चौटाला यांच्या निमंत्रणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसह बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हरियाणात पोहोचले होते.

हेही वाचा- “शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंची सभा झालीच पाहिजे, पण…” शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटलांचं विधान चर्चेत

यावेळी केलेल्या जाहीर भाषणातून शरद पवारांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. “जो आपल्यावर आत्महत्या करण्याची वेळ आणत आहे, त्यांना हटवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. आपण आत्महत्या करायची नाही, आपण परिस्थितीत बदल घडवून आणू. देशात सत्ता बदल घडवू. २०२४ मध्ये जेव्हा आपल्याला संधी मिळेल, तेव्हा देशात सत्ता बदल घडवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करू, आज याची नितांतआवश्यकता आहे, असंही पवार यावेळी म्हणाले.

हेही वाचा- फडणवीसांनी ६ जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद घेतल्यावरून अजित पवारांचा खोचक टोला; म्हणाले…

यावेळी रॅलीला संबोधित करताना बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही भाजपावर हल्लाबोल केला आहे. बिहारमध्ये सात राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. २०२४ मध्ये भाजपा देशात जिंकू शकत नाही. त्यामुळे आपण संपूर्ण देशाला संघटीत करायला हवं. याबाबत आम्ही काँग्रेसलाही विनंती केली आहे, असं झालं तरच २०२४ मध्ये भाजपाचा पराभव होईल, असं नितीशकुमार म्हणाले.