नेपाळमधील भारतीय दुतावासाजवळ एक शक्तिशाली स्फोट झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र, यामुळे भारतीय दुतावासाच्या इमारतीची भिंत कोसळली. सोमवारी रात्री नेपाळमधील बिराटनगरस्थित भारतीय दुतावासाजवळ हा स्फोट झाला. मोटारसायकलवरुन आलेल्या दोन अज्ञान तरुणांनी येथे बॉम्ब लावल्याचे सांगण्यात येत आहे. नेपाळ पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.

सुत्रांच्या माहितीनुसार, या स्फोटामागे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’चा हात असण्याची शक्यता आहे. कारण आयएसआयकडून याच प्रकारे इतरही भारतीय दुतावासांना टार्गेट करण्याचा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

नेपाळमधील वृत्तपत्र दैनिक नेपाळच्या माहितीनुसार, पोलीस प्रमुख अरुण कुमार यांनी सांगितले की, या स्फोटामुळे भारतीय दुतावासाची पश्चिम दिशेची भिंतीला मोठे नुकसान झाले आहे. नेपाळमध्ये नुकतेच कम्युनिस्ट पक्षाचे सरकार बनले आहे. याचे नेतृत्व के. पी. शर्मा ओली यांच्या हातात आहे. या शर्मा यांचा कल चीनच्या बाजूला झुकणारा आहे. यामुळे नेपाळमध्ये भारत विरोध वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नेपाळमधील भारतीय दुतावासाबाहेर झालेल्या स्फोटामुळे हा संशय खरा ठरण्याची चिन्हे आहेत.

नुकतेच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांनी नेपाळचा दौरा केला होता. ज्या प्रकारे चीन नेपाळमध्ये आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. ते पाहता पाकिस्तानचे पंतप्रधानांचा हा दौरा मोठा महत्वाचा मानला जात आहे.