पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नीति आयोगाच्या सातव्या गव्हर्निंग काउन्सिलची बैठक पार पडत आहे. राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात ही बैठक सुरू आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे दोन बडे नेते या बैठकीला गैरहजर राहिले आहेत. या बैठकीला गैरहजर राहण्यापूर्वी केसीआर यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. केंद्र सरकारकडून तेलंगणासह इतर राज्यांमध्ये भेदभाव केला जात आहे, याचा निषेध म्हणून आपण या बैठकीला गैरहजर राहणार असल्याचं केसीआर यांनी सांगितलं आहे. तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे नुकतेच कोविड-१९ संसर्गातून बरे झाले आहेत. त्यामुळे ते या बैठकीला गैरहजर राहिले आहेत. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमाला गैरहजर राहण्याची नितीश कुमार यांची ही एका महिन्यातील दुसरी वेळ आहे. हेही वाचा- तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांचा निती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार जुलै २०१९ नंतर गव्हर्निंग काउन्सिलची पहिल्यांदाच ऑफलाइन बैठक पार पडत आहे. या बैठकीला नीति आयोगाचे वरिष्ठ शिष्ठमंडळ, सर्व मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे लेफ्टनंट गव्हर्नर आणि अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू आहे.