महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मंगळवारी सांगितले की, देशाच्या पुढील राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवाराचा कोणताही निर्णय विविध पक्षांचे नेते एकत्रितपणे घेतील आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नावावर त्यांचा पक्ष सहमत असेल तरच विचार केला जाईल. पत्रकारांशी बोलताना नवाब मलिक यांनी दावा केला की भाजपाला उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये पराभव पत्करावा लागेल आणि ४०३ सदस्य असलेल्या उत्तरप्रदेश विधानसभेत भाजपाला १५० पेक्षा कमी जागा मिळतील. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि नंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतल्याचा संदर्भही त्यांनी दिला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधी आघाडी तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विरोधी पक्षांच्या एकत्रित नेतृत्वाखाली मोर्चेबांधणी केली जाईल, असंही मलिक म्हणाले. त्यासोबतच काँग्रेसशिवाय आघाडी नाही असंही ते म्हणाले. राष्ट्रपती पदासंदर्भातल्या एका प्रश्नावर मलिक म्हणाले की या वर्षाच्या अखेरीस "नितीश कुमार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (विरोधकांचे) उमेदवार असल्याच्या बातम्या आहेत"."जोपर्यंत ते (नितीश कुमार) भाजपाशी संबंध तोडत नाहीत, तोपर्यंत यावर चर्चा होऊ शकत नाही. आधी त्यांनी भाजपाशी संबंध तोडावेत आणि त्यानंतरच (त्यांच्या उमेदवारीचा) विचार करता येईल. सर्व (विरोधी) पक्षांचे नेते मग एकत्र बसून विचार करू,” असं मलिक म्हणाले.बिहारमध्ये सध्या जेडीयूची सत्ता भाजपसोबत आहे.