Mohan Bhagwat : ब्राह्मण असो, मुस्लिम असो की ख्रिश्चन कुणालाही संघात स्थान नाही असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. बंगळुरु या ठिकाणी एक खास परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत संघाच्या १०० वर्षांचा मागोवा घेतला जातो आहे. याच ठिकाणी मोहन भागवत यांचं एक व्याख्यानही पार पडलं. त्यावेळी संघाची १०० वर्षांची वाटचाल सोपी नव्हती असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता त्यांचं हे वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे.

काय म्हणाले मोहन भागवत?

“ब्राह्मण, मुस्लिम, ख्रिश्चन यांना संघात स्थान नाही. इथे येणारा माणूस हा फक्त हिंदूच हवा. आता तुम्हाला वाटेल मी असं का म्हटलं? माझं म्हणणं आहे की विविध जाती संप्रदायाचे, धर्माचे, पंथाचे मग ते ब्राह्मण असोत, मुस्लिम असोत की ख्रिश्चन कुणीही संघात येऊ शकतं. पण तुम्ही संघात आलात की तुम्ही हिंदू आहात, भारतमातेचे पुत्र आहात ही भावना हवी. मी अमक्या समाजाचा आहे, मी तमक्या जातीचा आहे, मी अमुक धर्माचा आहे ही भावना तुमच्या मनात अजिबात यायला नको. ती बाहेर ठेवून शाखेत यायचं असेल, संघात सहभागी व्हायचं असेल तर आनंदाने या. मुस्लिम, ख्रिश्चन धर्माचे लोकही संघात आहेत याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हिंदू समाजात इतर जात आणि धर्म यांचाही समावेश होतो. आम्ही संघात किती मुस्लिम आणि ख्रिश्चन आहेत हे मोजत नाही कारण आमच्यासाठी सगळेच भारतमातेचे पुत्र आहेत. आम्ही मुस्लिमांसाठी वेगळ्या शाळा, ख्रिश्चनांसाठी वेगळ्या संस्था, ब्राह्मणांसाठी वेगळ्या शाळा असं कधीही करत नाही. आमच्यासाठी सगळ्यांबाबतची भावना समान आहे. तुम्ही विशिष्ट जाती, धर्माचे असाल तर त्याचा आम्ही सन्मान करु. पण तुम्ही संघात आलात, शाखेत आलात की तुम्ही भारतमातेचे पुत्र आहात संघाची कार्यपद्धती अशाच तऱ्हेची आहे.” असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

संघाची १०० वर्षांची वाटचाल सोपी नव्हती-भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत भूमिका मांडताना मोहन भागवत म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठीचं मार्गक्रमण हे सोपं नव्हतं. संघाला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यातली ६० ते ७० वर्षे ही संघर्षाची आणि तीव्र विरोध सहन करायला लावणारी होती. संघावर दोनवेळा बंदी घातली गेली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांवर हल्लेही झाले, टीका झाली, स्वयंसेवकांच्या हत्या झाल्या. आपला विस्तार होऊ नये यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न झाले. मात्र स्वयंसेवकांनी ते होऊ दिलं नाही. निस्पृह भावनेने स्वयंसेवक आणि संघ काम करत राहिला. त्यामुळेच आपण लोकांच्या मनांमध्ये विश्वास निर्माण करु शकलो असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

भारताची मूळ संस्कृती आपल्याला हिंदू शब्दाकडे घेऊन जाते-भागवत

हिंदू समाजावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लक्ष्य केंद्रीत केलं की आम्हाला प्रश्न विचारला जातो की तुम्ही हे का करत आहात? प्रत्येक हिंदू हा भारतासाठी जबाबदार व्यक्ती आहे. आपल्याला आपली राष्ट्रीयता ही ब्रिटिशांनी दिलेली नाही. आपण प्राचीन काळापासून हिंदू आहोत. जगातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांना हे वास्तव ठाऊक आहे. प्रत्येक राष्ट्राची एक मूळ संस्कृती असते. भारताची मूळ संस्कृती काय? हा प्रश्न आपण विचारला तर त्याचं जे वर्णन आहे ते आपल्याला हिंदू या शब्दाकडे घेऊन जातं असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.