कोणत्याही अस्सल साहित्यिकाला तो ज्या मातीत राहातो त्या मातीतल्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक भूतकाळात तसंच उज्ज्वल भविष्यकाळासाठी त्या मातीतल्या माणसांच्या वर्तमानात सुरू असलेल्या संघर्षांतच शाश्वत अशी साहित्यबीजं गवसतात. दुसऱ्या महायुद्धाच्या उंबरठय़ावर जन्मलेले पॅट्रिक मोदियानो यांनीही पॅरिसच्या भवतालातून बरंच काही टिपलं आणि त्यांच्या संवेदनाशील मनानं त्यांना साहित्यातून शाश्वत अवकाश प्राप्त करून दिला.
जगातली अनेक समीकरणंच नव्हे तर सामान्य माणसाच्या भावविश्वाची घडणही बदलून टाकणारं दुसरं महायुद्ध संपत असतानाच ज्यू बापाच्या पोटी पॅट्रिक यांचा जन्म झाला. १९४०पासून फ्रान्समध्ये नाझी फौजांनी पाय रोवला होता. त्या फौजांविरोधातील लढा पॅरिसमध्ये तीव्र झाला आणि महायुद्ध संपण्याच्या वर्षभर आधीच, १९४४मध्ये पॅरिस नाझींच्या जोखडातून मुक्त झाला. तरी या संघर्षांचे, नाझी अस्तित्वाच्या पाशवीपणाचे आणि मोकळा श्वास घेत उभा राहण्याच्या धडपडीचे अनेक भलेबुरे संस्कार संवेदनशील आणि कलासक्त फ्रेंच समाजावर झालेच. त्या संस्कारांच्या सोबतीनेच पॅट्रिक यांची जडणघडण सुरू झाली. आपल्या भवतालच्या अगणित माणसांवरचे नाझीशाहीचे अदृश्य ठसे शोधण्यासाठी, त्या खपल्या काढण्यासाठी आणि जखमा भरण्यासाठीही शब्दांशिवाय दुसरा आधार नव्हता. त्या शब्दांशीच मग पॅट्रिक यांचे भावबंध जुळले. त्यातूनच अनेक व्यक्तिरेखा त्यांच्यासमोर उभ्या राहिल्या.
त्यांची दु:ख, त्यांच्या वेदना, त्यांचा संघर्ष, भूतकाळातल्या स्मृतींचं ओझं झुगारण्याची त्यांची धडपड, चांगल्या भविष्याच्या आशेनं वर्तमानाशी सुरू असलेली त्यांची लढाई हे सारं काही त्यांच्या साहित्यातून उमटलं. एखाद्या डोंगरावर उभं रहावं आणि साद देताच अनेक प्रतिध्वनी उमटावेत तशी अनुभवांच्या शिखरावर उभं राहून त्यांनी जी संवेदनशील साद घातली तिचे प्रतिध्वनी त्यांच्या अनेक कादंबऱ्यांतून उमटले.
पॅट्रिक तसे अबोल. स्वत:च्याच विश्वात रमणारे. त्यामुळे लोकांच्या चाहतेपणापासून आणि माध्यमांच्या प्रसिद्धीवेल्हाळपणापासून दूर राहून ते शब्दांच्या उपासनेत वयाच्या ६९व्या वर्षी आजही दंग आहेत.