पीटीआय, नवी दिल्ली, गुवाहाटी
ईशान्य भारतातील पूरग्रस्त राज्यांना शक्य ती सर्व मदत केली जाईल असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिले. आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, सिक्कीम, त्रिपुरा या राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे तेथील पूरस्थिती कायम आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना बाहेर काढून त्यांना मदत शिबिरांमध्ये पाठवण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा आणि सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करून परिस्थितीचा आठावा घेतला. तसेच त्यांनी मणिपूरचे राज्यपाल अजय भल्ला यांच्याकडूनही तेथील परिस्थितीची माहिती घेतली. ईशान्य भारतात विविध ठिकाणी पावसाशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत ३६ जणांचा बळी गेला असून साडेपाच लाखांपेक्षा जास्त लोकांना पुराचा फटका बसला आहे.
आसाममध्ये २० जिल्ह्यांतील जवळपास ५.३५ लाख लोकांना पूरस्थितीने प्रभावित झाले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे. तसेच ब्रह्मपुत्रा, बराक आणि कोपिली या नद्या अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. मणिपूरमध्ये ५६ हजारांपेक्षा जास्त लोकांना पुराचा फटका बसला असून तब्बल १० हजार ४७७ घरांचे नुकसान झाले आहे. मिझोरममध्ये १० जिल्ह्यांमधील सर्व शाळा मंगळवारी सलग चौथ्या दिवशी बंद राहिल्या. सिक्कीममध्ये छातेन येथे अडकलेल्या ३४ जणांची सुटका करण्यात आली.
मिझोरममध्ये भूस्खलनाच्या ५५२ घटना
मिझोरममध्ये १० दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे तेथील परिस्थिती बिकट झाली आहे. आतापर्यंत त्या राज्यात पावसाने पाच जणांचा बळी गेला असून भूस्खलनाच्या ५५२ घटना घडल्या आहेत. तसेच १५२ घरांचे पूर्ण किंवा अंशत: नुकसान झाले असल्याची माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन विभागाने मंगळवारी दिली. मिझोराममधील ११ जिल्ह्यांपैकी म्यानमारला लागून असलेल्या चम्फाई जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. तिथे २०९ ठिकाणी भूस्खलन झाले असून तिघांचा मृत्यू झाला आहे.
पंतप्रधानांनी आज सकाळी मला फोन केला आणि मी त्यांनी राज्यातील पूरग्रस्त लोकांच्या समस्यांबद्दल माहिती दिली. त्यांनी मला सर्व ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. मदतवाटपाची दीर्घ प्रक्रिया बाजूला ठेवून लोकांना मदत करावी असे आदेश मी प्रशासनाला दिले आहेत.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.हिमांता बिसवा सरमा, मुख्यमंत्री, आसाम