Operation Sindoor: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यातील एका कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या योगदानाचे कौतुक केले.

याचबरोबर पंतप्रधानांनी भारतीय लष्कराने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ वरही भाष्य केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “ऑपरेशन सिंदूर ही भारताच्या इतिहासातील दहशतवादाविरुद्धची सर्वात मोठी आणि यशस्वी कारवाई आहे. ज्याचा पाकिस्तानी सैन्याने विचारही केला नव्हता, तिथे आपल्या सैन्याने दहशतवाद्यांचे अड्डे शेकडो किलोमीटर आत घुसून उद्ध्वस्त केले.”

मोदी पुढे म्हणाले, “आता भारतातील प्रत्येक नागरिक हे म्हणतो आहे की, जर तुम्ही एक गोळी झाडली, तर त्याला उत्तर गोळ्यांनी दिलं जाईल.”

अहिल्यादेवी होळकर यांच्या सामाजिक कार्याबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “अहिल्यादेवी होळकर यांनी गुलामगिरीच्या कठीण काळात काशी विश्वनाथसह अनेक तीर्थक्षेत्रे आणि मंदिरांची पुनर्बांधणी करून देशाची संस्कृती जिवंत ठेवली. ज्या काशीमध्ये अहिल्याबाईंनी विकासाचे काम केले, तिथेच मला सेवा करण्याची संधी मिळाली आहे. काशी विश्वनाथ संकुलातील त्यांचा पुतळा आजही प्रेरणा देतो.”

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “२५०-३०० वर्षांपूर्वी जेव्हा देश परकीय राजवटीखाली होता, तेव्हा अहिल्यादेवींनी असे काम केले, जे येणाऱ्या पिढ्यांनाही लक्षात राहिल. हे सोपे नव्हते. अहिल्यादेवींसारखी इच्छाशक्ती आणि दृढनिश्चय असेल तर कोणताही अडथळा मोठा नसतो. आज इंदूर एक समृद्ध शहर म्हणून ओळखले जाते, पण त्याचा पाया अहिल्यादेवींच्या कार्यक्षम प्रशासनाने घातला होता.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त त्यांना समर्पित एक स्मारक टपाल तिकिट आणि ३०० रुपयांचे विशेष नाणे प्रसिद्ध केले. या प्रसंगी आदिवासी महिला कलाकारांना अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यानंतर भारताने कठोर पाऊले उचलत ऑपरेशन सिंदूर राबावले होते. या ऑपरेशनद्वारे भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले होते.