लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात श्वेतपत्रिका सादर केल्यानंतर आज यासंदर्भातल्या चर्चे दरम्यान निर्मला सीतारमण यांनी भारतीय अर्थव्यवस्थेने आता पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. मात्र यूपीएच्या काळात अर्थव्यवस्थेचा स्तर उंचावण्यासाठी विशेष काही घडलं नाही असं म्हटलं आहे. निर्मला सीतारमण काय काय म्हणाल्या? यूपीएच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक अवस्थेत होती. आम्ही आमच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात ही अर्थव्यवस्था जगातल्या पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये आणून ठेवली आहे. जी श्वेतपत्रिका आम्ही मांडली आहे ती जबाबदारीने मांडली आहे. ही एक गंभीर बाब आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं. एनडीच्या कार्यकाळात देशाने आर्थिक स्तरावर चांगली प्रगती केली. सरकार योग्य पद्धीतीने चालवण्याची नियत असेल तर अर्थव्यवस्थेचा आलेख उंचावतोच. जे आमच्या काळात झालं आहे. यूपीएच्या काळात राष्ट्रकुल स्पर्धांचा घोटाळा, कोळसा घोटाळा असे किती तरी घोटाळे झाले. त्यामुळे देशाची प्रतिमा डागाळली. यूपीएच्या कार्यकाळात हे घोटाळे झाले. अर्थमंत्री पुढे म्हणाल्या जर आमच्या अधिवेशनात विरोधकांना चर्चा घडवून आणायची असेल तर आमची काहीही हरकत नाही. मात्र विरोधी पक्षाकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही. ते फक्त गदारोळ घालतात. यूपीए काळात कोळसा घोटाळा झाला त्यामुळे देशाचं खूप मोठं नुकसान झालं. देशात दीर्घ काळ कुठलाही नवा रोजगार निर्माण होऊ शकला नाही. देशाला कोळसाही बाहेरुन मागवावा लागत असे. मोदी सरकार सत्तेवर असताना कोव्हिडचं संकट आलं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणी निर्णयांमुळे या संकटाचाही आपण सामना केला आणि अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावरुन पाचव्या क्रमाकांवर आणली. तसंच आपण अजूनही आपल्या अर्थव्यवस्थेला बळ देत आहोत. हे पण वाचा- विश्लेषण : मोदी सरकारने लोकसभेत सादर केलेल्या श्वेतपत्रिकेत नेमकं काय आहे? वाचा सविस्तर… आजचा विरोधी पक्ष हा मगरीचे अश्रू ढाळतो आहे. मात्र कोळसा घोटाळ्यात कुणाचे हात काळे झाले? ते जरा बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुमची ही चूकही सुधारली आहे असाही टोला निर्मला सीतारमण यांनी लगावला.