एकीकडे करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने अनेक ठिकाणी स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी रांगा लागत असल्याचं चित्र आहे. यादरम्यान गंगेच्या किनारी करोना रुग्णांचे मृतदेह वाहून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यामुळे प्रशासन चिंतेत आहे. बिहारमधील बक्सममध्ये गंगेच्या किनारी लागलेला मृतदेहांचा ढीग पाहून गावकरीदेखील घाबरले आहेत. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, चौशा शहरात हा प्रकार घडला आहे.

सकाळी जेव्हा गावकरी नदी किनाऱ्यावर गावकरी पोहोचले तेव्हा तेथील चित्र पाहून त्यांना धक्काच बसला आणि त्यांनी तात्काळ प्रशासनाला यासंबंधी माहिती दिली. हे मृतदेह उत्तर प्रदेश येथून वाहून आले असल्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. संबंधित करोना रुग्णांच्या नातेवाईकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी किंवा दफन करण्यासाठी जागा मिळाली नसावी असा अंदाज आहे.

गंगेच्या किनारी वाहून आले करोना रुग्णांचे मृतदेह

“४० ते ४५ मृतदेह पाण्यात तरंगत होते,” अशी माहिती चौशा जिल्ह्याचे अधिकारी अशोक कुमार यांनी दिली आहे. अशोक कुमार यावेळी घटनास्थळी महादेव घाट येथे उभे राहून बोलत होते. हे मृतदेह पाण्यात फेकून दिले असावेत अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. मृतदेहांची संख्या १०० पर्यंत जाऊ शकते असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.

“हे मृतदेह गेल्या पाच ते सात दिवसांपासून पाण्यात असल्याने फुगले आहेत. आम्ही त्यांची विल्हेवाट लावत आहोत. हे मृतदेह उत्तर प्रदेशातील बहारिच, वाराणसी किंवा अलाहाबाद यापैकी कोणत्या शहरातील आहेत याचा तपास करणार आहोत,” अशी माहिती के के उपाध्याय या अधिकाऱ्याने दिली आहे. “हे मृतदेह येथील नाहीत, कारण आमच्याकडे मृतदेह पाण्यात सोडण्याची परंपरा नाही,” असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान या मृतदेहांमुळे पाण्यातून संसर्ग फैलावण्याची भीती सध्या शहरात आहे. मृतदेहांचा खच लागला असून अनेक श्वानदेखील त्याठिकाणी दिसत होते. यामुळे स्थानिकांच्या मनात खूप भीती आहे. करोनाची लागण होण्याची भीती असून गावकऱ्यांनी हे मृतदेह दफन करण्याची मागणी केली आहे. दरम्यान मृतदेहांवरुन सध्या बिहार आणि उत्तर प्रदेशात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.