Indus Water Treaty India Pakistan Conflict in UN News : भारताने संयुक्त राष्ट्रांसमोर पुन्हा एकदा पाकिस्तानला आरसा दाखवला आहे. “पाकिस्तान सातत्याने दहशतवादाला खतपाणी घालत असल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबरचे सर्व संबंध तोडले आहेत”, असं भारताने यूएनसमोर स्पष्ट केलं आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानबरोबरचा सिंदू जलकरार स्थगित केला आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांमध्ये जल करारावरील आरिया (Arria) फॉर्म्युला बैठकीत भारताचे प्रतिनिधी पार्वतानेनी हरीश यांनी सिंधू जलकरार कधीपर्यंत स्थगित राहील याची माहिती दिली.
संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे प्रतिनिधी पी. हरीश म्हणाले, “भारताने ६५ वर्षांपूर्वी अत्यंत सद्भावनेने सिंधू जलकरार केला होता. या काळात पाकिस्तानने आमच्याशी तीन वेळा युद्धे केली, आमच्या देशात हजारो दहशतवादी हल्ले घडवून आणले. त्यांनी आमच्या सहनशीलतेचा अंत पाहिला. त्यांच्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये २०,००० भारतीय नागरिक मारले गेले आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ला हे त्यापैकी ताजं उदाहरण आहे. परंतु, भारताने नेहमी संयम आणि धीर दाखवला”.
“पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद भारताची डोकेदुखी ठरतोय”
पी. हरीश म्हणाले, “पाकिस्तानच्या सीमेवरील कुरापती, युद्धे, दहशतवादी कारवाया चालू असताना दुसऱ्या बाजूला भारताने नेहमीच असाधारण संयम, धीर व उदारता दाखवली आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद भारताची डोकेदुखी ठरतोय. सीमेवरील नागरिकांचं जीवन विस्कळीत राहिलं आहे, तिथल्या अर्थिक विकासासमोर अडचणी निर्माण होत आहेत. गेल्या ६५ वर्षांमध्ये धरणांच्या पायाभूत सुविधांमध्ये बरेच बदल झाले आहेत, तंत्रज्ञान देखील बदललं आहे. तरी काही जुनी धरणं सुरक्षेसंबंधीच्या आव्हानांचा सामना करत आहेत”.
भारताची पाकिस्तानला चपराक
पाकिस्तानवर हल्लाबोल करत पार्वतानेनी हरीश म्हणाले, “धरणांच्या पायाभूत सुविधा आता विकसित करायला हव्यात. मात्र, नवे बदल व सुविधांच्या विकासास पाकिस्तानने नेहमीच आडकाठी केली आहे. २०१२ मध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी जम्म-काश्मीरमधील तुलबूल नेव्हिगेशन प्रकल्पावर हल्ला केला. यामुळे आमचे प्रकल्प थांबले. प्रकल्प व नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. तरीदेखील गेल्या दोन वर्षांमध्ये आम्ही पाकिस्तानबरोबर सिंदू करारातील सुधारणांवर चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतु, आमच्या हाती काय आलं? केवळ दहशतवादी हल्ले”.
सिंधू जलकरार कधीपर्यंत स्थगित राहणार?
भारताने म्हटलं आहे की पाकिस्तानच्या कुरापती थांबल्या नाहीत तर सिंदू करार असाच स्थगित राहील (स्थगितीचा कालावधी वाढेल). पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवत नाही तोवर ही स्थगिती कायम राहील. पाकिस्तान हा सातत्याने सिंदू जलकराराचं उल्लंघन करतोय. त्यामुळे आम्ही देखील स्वस्थ बसू शकत नाही.