पाकिस्तानने १९९० च्या सुमारास काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्यासाठी लष्कर-ए-तोयबासारख्या दहशतवादी संघटनांना पाठिंबा दिला होता, अशी कबुली माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी दिली आहे. पाकिस्तान त्यांच्या या विधानामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर अडचणीत आला आहे.

माजी अध्यक्ष मुशर्रफ यांनी सांगितले की, ओसामा बिन लादेन व अयामन अल जवाहिरी हे पाकिस्तानचे नायक होते, पण नंतर ते खलनायक झाले. १९९० मध्ये काश्मीरचा स्वातंत्र्यलढा सुरू झाला. त्यावेळी लष्कर ए तोयबा व इतर ११-१२ संघटना काम करीत होत्या. त्यांना आम्ही पाठिंबा दिला व प्रशिक्षण दिले कारण ते प्राणाची बाजी लावून काश्मीरसाठी लढत होते.
माजी लष्करप्रमुख असलेल्या मुशर्रफ यांच्या वक्तव्याने पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा दिल्याचे जाहीरपणे जगासमोर आले आहे.
लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद व झाकी उर रहमान यांच्यावरील कारवाईबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, सईद व लख्वीसारख्या लोकांना त्या काळात नायकाचा दर्जा होता. नंतर धार्मिक अतिरेकवाद हा दहशतवादात रूपांतरित झाला व आता पाकिस्तानात त्यांना दहशतवादी म्हटले जाते. ते आता आमच्याच लोकांना मारत आहेत त्यांना रोखले पाहिजे. सईद व लख्वी यांना रोखले पाहिजे का यावर त्यांनी नो कॉमेंट्स असे उत्तर दिले. धार्मिक अतिरेकवाद पहिल्यांदा पाकिस्तानात सुरू झाला त्यातून पुढे दहशतवादी तयार झाले व ते जगात सोविएत फौजांविरोधात लढले. १९७९ मध्ये पाकिस्तान हा धार्मिक अतिरेकवादाच्या बाजूने होता. आम्ही तालिबानला रशियाविरोधात लढण्याचे प्रशिक्षण दिले. तालिबान, हक्कानी, ओसामा बिन लादेन व जवाहिरी हे त्याकाळात आमचे नायक होते पण नंतर ते खलनायक झाले. भारतातील दहशतवादी कारवायात पाकिस्तानचा हात आहे हा आरोप त्यामुळे खरा असल्याची कबुली मुशर्रफ यांनी दिली आहे.