India vs Pakistan Operation Sindoor Latest Updates : पाकिस्तानसमर्थित दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला घडवून २६ पर्यटकांचा जीव घेतला. या बदल्यात भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात मोहीम उघडली असून पाकिस्तानविरोधात कारवाई सुरुवात केली आहे. भारताने पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवलं असून त्यांनी आपले सैन्य पुढे सरकवायला सुरुवात केली असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेत आज दिली.
“पाकिस्तानी सैन्याने आपले सैन्य पुढच्या भागांकडे हलवले आहे, यामुळे तणाव आणखी वाढत जाणार असल्याचे संकेत आहेत. भारतीय सशस्त्र दल उच्च ऑपरेशनल तयारीत आहेत आणि सर्व शत्रुत्वाच्या कृतींना प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्यात आले आहे आणि प्रमाणानुसार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. पाकिस्तानने योग्य प्रतिसाद दिला तर हा तणाव न वाढवण्याचा प्रयत्न भारताकडून करण्यात येणार आहे”, अशी माहिती आज विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत दिली.
भारताच्या हवाई तळांना पाकिस्तानकडून लक्ष्य
“पाकिस्तानने जाणूनबुजून हवाई तळांना लक्ष्य केल्यामुळे भारतीय सशस्त्र दलांनी जलद आणि सुनियोजित प्रत्युत्तर कारवाई केली. रफीकी, मुरीद, चकलाला, रहीम यार खान, सुक्कुर आणि चुनियान येथील पाकिस्तानी लष्करी तळांना हवाई प्रक्षेपण, अचूक दारूगोळा आणि लढाऊ विमानांद्वारे लक्ष्य केले गेले. पसरूरमधील रडार साइट आणि सियालकोटमधील विमान तळाला देखील अचूक दारूगोळा वापरून लक्ष्य केले गेले. या कारवाई दरम्यान भारताने कमीत कमी नुकसान करण्याचा प्रयत्न केला”, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
पाकिस्तानकडून २६ ठिकाणांहून घुसखोरीचा प्रयत्न
“पाकिस्तानी सैन्य पश्चिम सीमेवर सतत हल्ले करत आहे, त्यांनी भारताच्या लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी ड्रोन, लांब पल्ल्याची शस्त्रे, युद्धसामग्री आणि लढाऊ विमानांचा वापर केला आहे. पण भारताने पाकिस्तानचे हे हल्ले परतवून लावले. तरीही पाकिस्तानने २६ हून अधिक ठिकाणी हवाई मार्गाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी उधमपूर, भूज, पठाणकोट, भटिंडा येथील हवाई दलाच्या तळांवर आमच्या उपकरणे आणि कर्मचाऱ्यांचे नुकसान केले. त्यांनी पहाटे १:४० वाजता पंजाबच्या हवाई तळाला लक्ष्य करण्यासाठी हाय-स्पीड क्षेपणास्त्रांचा वापर केला. त्यांनी आरोग्य सुविधा आणि शाळांवरही हल्ला केला, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.