“भारताच्या उत्तर आणि पूर्व सीमेवर तणाव कायम आहे. चीन आणि पाकिस्तानकडून अशी स्थिती निर्माण केली जात आहे. सीमावाद एका मोहिमेतंर्गत निर्माण केला जातोय” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सोमवारी म्हणाले. या दोन्ही देशांकडून असलेल्या धोक्यांकडे त्यांनी लक्ष वेधले.

“आपल्या उत्तर आणि पूर्व सीमेवर जी परिस्थिती निर्माण केलीय, त्याची तुम्हाला कल्पना असेल. आधी पाकिस्ताना आणि आता चीन. एका मिशनतंर्गत सीमावाद निर्माण केला जातोय. या दोन्ही देशांसोबत आपली सात हजार किलोमीटरची सीमारेषा आहे. तिथे नेहमीच तणाव असतो” असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

चीनला लागून असलेल्या पूर्व लडाख सीमेवर सध्या प्रचंड तणावाची स्थिती आहे. पाकिस्तान बरोबर नेहमीच संघर्ष सुरु असतो. काही दिवसांपूर्वी एअर फोर्स प्रमुखांनी हवाई दल एकाचवेळी दोन आघाड्यांवर लढण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटले होते.

राजनाथ सिंह यांनी केले ४४ पुलांचं उद्घाटन
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज (सोमवार) लडाख, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि जम्मू-काश्मीरच्या सीमा भागात उभारण्यात आलेल्या ४४ पुलांचं ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे उद्घाटन केलं.

अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार या ४४ पुलांपैकी लडाखमधील सात पुलांसह बहुतांश पूल हे रणनितीच्यादृष्टीने महत्वपूर्ण भागात आहेत. ज्यांची आपल्या सैन्याला शस्त्रांची वाहतूक करण्यासाठी मदत होणार आहे. हे पूल बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन(बीआरओ) कडून उभारण्यात आले आहेत.