पीटीआय, बंगळुरू
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे (यूएनएससी) जुलै महिन्याचे अध्यक्षपद पाकिस्तानला मिळाल्यामुळे भारताची राजनैतिक पीछेहाट झाली असल्याची टीका काँग्रेसने बुधवारी केली. पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांची महत्त्वाची पदे मिळवण्यापासून रोखण्यात केंद्र सरकारला अपयश आले असे काँग्रेसने म्हटले आहे.
पाकिस्तानला जानेवारी २०२५पासून ‘यूएनएससी’चे दोन वर्षांचे अस्थायी सदस्यत्व मिळाले आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांना जुलै महिन्याचे अध्यक्षपद मिळाले. या अध्यक्षपदासह पाकिस्तानला तालिबानवर निर्बंध घालणाऱ्या समितीचे अध्यक्षपद आणि संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी समितीचे उपाध्यक्षपदही मिळाले. त्यामुळे काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस रणदीपसिंह सुरजेवाला बंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, पाकिस्तानसारख्या दहशतवादी राष्ट्राला आता जागतिक सुरक्षेचे मध्यस्थ केले आहे. सैतानाला खुर्चीत बसवण्यात आले आहे. दहशतवाद्यांना पोसणारे, प्रोत्साहन देणारे आणि भारतात दहशतवादाची निर्यात करण्याच्या पाकिस्तानच्या कृती सिद्ध झाल्या आहेत, असेही ते म्हणाले.
‘यूएनएससी’चे अध्यक्षपद महिनाभर पाकिस्तानला मिळाल्यानंतर काँग्रेसची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एस जयशंकर यांनी परराष्ट्र धोरणाबद्दल कितीही दावे केले तरी ते जागतिक पातळीवर पाकिस्तानला पदे मिळण्याविरोधात पाठिंबा मिळवण्यात अपयशी ठरली आहेत. – रणदीपसिंह सुरजेवाला, सरचिटणीस, काँग्रेस</strong>