पीटीआय, मुंबई/ कोलकाता/अहमदाबाद

अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेनंतर ‘एअर इंडिया’समोरील तांत्रिक अडचणींचे सत्र कायम आहे. वाढीव सुरक्षा तपासणीमुळे बहुतेक उड्डाणांना विलंब होत असून, विमानांची उपलब्धताही कमी झाली आहे. त्यामुळे एअर इंडियाच्या ‘बोइंग ७८७’द्वारे चालवली जाणारी उड्डाणे रद्द करण्याची नामुष्की ओढावत आहे. यातूनच मंगळवारी नऊ विमाने रद्द करावी लागली. तांत्रिक बिघाड, विमानांच्या कमी उपलब्धतेबरोबर खराब हवामानाचा फटकाही ‘एअर इंडिया’ला बसत आहे.

अहमदाबाद दुर्घटनेनंतर ‘बोइंग-ड्रीमलायनर’ विमानांबाबत ‘एअर इंडिया’ सावध पावले टाकत आहे. विमान वाहतूक महासंचालनालयाने ‘एअर इंडिया’च्या ७८७ पैकी सर्व ३३ विमानांची अतिरिक्त देखभाल तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. वाढीव सुरक्षा तपासणीमुळे तांत्रिक अडचणी असल्याचे समोर आल्यास विमानोड्डाण रद्द करण्यात येत आहेत. दरम्यान, प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याबरोबरच, तिकीट रद्द केल्यावर पूर्ण परतावा दिला जाणार असल्याचे ‘एअर इंडिया’कडून सांगण्यात आले.

लुफ्थांसा’ला हैदराबादमध्ये उतरण्यास नकार

फ्रँकफर्टहून (जर्मनी) रविवारी दुपारी अडीच वाजता निघालले ‘लुफ्थांसा’ कंपनीचे एलएच ७५२ विमान सोमवारी सकाळी ६ वाजता हैदराबाद येथे उतरणे अपेक्षित होते. परंतु बॉम्बच्या धमकीमुळे या विमानाला उतरण्याची परवानगी नाकारण्यात आली. परिणामी २० तासांच्या प्रवासानंतरही हे विमान पुन्हा फ्रँकफर्टला परतले. यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. १५ जून रोजी सायंकाळी ६:०१ वाजता लुफ्थांसाच्या या विमानात बॉम्ब असल्याचा ई-मेल हैदराबाद विमानतळावर प्राप्त झाला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

इंडिगो’च्या विमानाला हवामानाचा फटका

गोव्याहून लखनऊला जाणाऱ्या ‘इंडिगो’ कंपनीच्या विमानाला सोमवारी प्रतिकूल हवामानामुळे हवेत हेलकावे खावे लागले. परंतु वैमानिकाने ही परिस्थित सुरक्षितरित्या हाताळली, असे विमान कंपनीने मंगळवारी एका निवेदनात म्हटले आहे. विमान क्रमांक ‘६ इ-६८११’ हे विमान लखनौमध्ये सुरक्षितपणे उतरले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोचीदिल्ली विमानात बॉम्बची अफवा

कोचीहून दिल्लीकडे निघालेल्या इंडिगो कंपनीच्या विमानात बॉम्ब असल्याचा ई-मेल आल्यानंतर मंगळवारी सकाळी या विमानाचे नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानाची कसून तपासणी केली, परंतु काहीही संशयास्पद आढळून न आल्याने दुपारी ३.१० वाजता विमान दिल्लीकडे रवाना झाले. मस्कटहून कोची आणि कोचीहून दिल्लीकडे जाणाऱ्या विमानात बॉम्बचा संदेश कोची विमानतळाला आला होता.