केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी सनदी लेखापाल (Chartered accountant) समुहासमोर बोलताना त्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिलाय. तसेच सनदी लेखापाल (CA) व्यवसायाची प्रतिमा काही लोकांमुळे खराब होत असल्याचंही ते म्हणाले. “२-४ मोठ्या नावांनी रत्न आणि दागिने व्यवसाय उद्ध्वस्त केलाय. त्यामुळे आज कोणतीही बँक त्यांना कर्ज देत नाही,” असं मत गोयल यांनी व्यक्त केलं.

पीयूष गोयल म्हणाले, “चार्टर्ड अकाउंटंट (Chartered accountant- CA) समुहाला आत्मनिरीक्षण करायला हवं. या व्यवसायाची विश्वासार्हता वाढवण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधले पाहिजे. सर्व लोक वाईट नाही, मात्र काही अपवादांमुळे या व्यवसायाच्या प्रतिष्ठेला बाधा आली आहे. सीएचा व्यवसाय हा ‘गेटकिपरप्रमाणे आहे. त्यांची राष्ट्राच्या निर्मितीत मोठी भूमिका आहे.”

“रत्न आणि दागिने व्यवसायाची प्रतिमा काही अपवादांमुळे प्रचंड खराब झालीय. आज कोणतीच बँक त्यांना कर्ज देत नाही. २-४ मोठ्या नावांनी हे संपूर्ण क्षेत्र उद्ध्वस्त केलंय. प्रत्येक सोनाराला हे लोक कोण आहेत आणि त्यांनी काय केलंय हे माहिती आहे. मात्र, हे कुणीतर त्यांच्या ताळेबंदावर सही करत होतं म्हणून हे सर्व घडलं. देशात जे काही घडलंय त्या सूत्रात सीए देखील आहेत या वास्तवाकडे दुर्लक्ष करता येणार नाही.”

आपण समाजाचे नैतिक मार्गदर्शक आहोत. ऑडिट करणं हे सीएचं एक अविभाज्य काम आहे. मात्र, प्रामाणिकपणे ऑडिट करणं हे आपलं कर्तव्य आणि कटिबद्धता आहे. परिवर्तन आतूनच येईल. त्यासाठी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. नवे पायंडे आणि मैलाचे दगड तयार करणं गरजेचं आहे. यासाठी सांख्यिकी मार्गांचा वापर केला पाहिजे. सीए समुहाने आपल्या आजूबाजूला सुरू असलेल्या चुकीच्या गोष्टी करणाऱ्या लोकांचा पर्दाफाश करावा.