BSF Jawan Purnam Kumar Shaw Wife Reaction : २२ एप्रिल जम्मूच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय जवान पूर्णम शॉ यांनी चुकून भारतीय सीमा ओलांडून पाकिस्तानात गेले होते. त्यांना पाकिस्तान रेंजर्सने ताब्यात घेतलं होतं. जवळपास २०-२२ दिवस पाकिस्तानांच्या ताब्यात राहिलेल्या पूर्णम शॉ यांना पाकिस्तानने अखरे भारतात सोडलं आहे. यावर त्यांची पत्नी रजनी शॉ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानून अत्यंत भावूक प्रतिक्रिया दिली आहे.
“पूर्णम शॉ २० दिवस भारतात नव्हते. पाकिस्तानात अटकेत होते. आज सकाळीच साडेदहा वाजता फोन आला की ते भारतात आले आहेत. ते पूर्णपणे व्यवस्थित आहेत. त्यांनी मला व्हिडिओ कॉलही केला होता. ते एकदम व्यवस्थित आहेत”, असं पूर्णम शॉ यांच्या पत्नी रजनी शॉ म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांबरोबर माझा संवाद झाला होता. त्यांनीही सांगितलं होतं की याच आठवड्यात ते परत येतील. सर्वांनी सहकार्य केलं. संपूर्ण देश माझ्या पाठीशी होता.”
“२२ एप्रिलला पहलगाम अटॅक झाला. त्यानंतर १५ ते २० दिवसांत ऑपरेशन सिंदूर राबवून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येकाच्या सौभाग्याचा बदला घेतला. त्यानंतर तीन ते चार दिवसांनी त्यांनी माझं सौभाग्य परत आणलंय”, असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.
कोण आहेत पूर्णम शॉ?
दरम्यान, पूर्णम शॉ हे मुळचे पश्चिम बंगालचे आहेत. सध्या त्यांची सुरक्षा अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. पूर्णम शॉ हे बीएसएफच्या १८२ व्या बटालियनचे जवान आहेत. २३ एप्रिल रोजी फिरोजपूरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील कुंपणाजवळ गस्त घालत असताना ते सीमेपलीकडे गेले. यावेळी त्यांनी गणवेश परिधान केलेला होता आणि त्यांच्याकडे सर्व्हिस रायफलही होती. विश्रांतीसाठी सावलीत थांबण्यासाठी गेल्यानंतर ते चुकून सीमेपलीकडे गेले होते. तिथून पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना अटक केली.
पूर्णम शॉ यांच्या अटकेनंतर भारतीय लष्कर आणि पाकिस्तानच्या रेंजर्स अधिकाऱ्यांनी हे प्रकरण सोडविण्यासाठी बैठक घेतली आणि त्यातून तोडगा निघाल्यानंतर शॉ यांची सुटका झाली.