नवी दिल्ली : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचे लक्ष दुसरीकडे वेधण्याची कला साध्य केली आहे.’’ अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी ‘ट्वीट’द्वारे केली. त्यांनी म्हटले, की सध्या बेरोजगारीने सार्वकालीक उच्चांक गाठला आहे, घाऊक किंमत निर्देशांकाने (डब्ल्यूपीआय) उच्चांकी पातळी गाठली आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) १७ अब्ज डॉलरचे अवमूल्यन यासारख्या समस्यांकडे दुर्लक्ष करता येत नाही, असे राहुल यांनी नमूद केले. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे ७८ रुपयांपर्यंत अवमूल्यन झाले आहे. ‘डीएचएफएल’प्रकरण सर्वात मोठी बँक फसवणूक आहे. सर्वसामान्य भारतीय नागरिक अशा समस्यांशी झुंजत असताना मोदी मात्र त्यांचे लक्ष अन्यत्र वळवण्याच्या प्रयत्नांत व्यस्त आहेत. पंतप्रधानांचे हे कौशल्य मूळ समस्या-संकटे लपवू शकत नाहीत, असे ते म्हणाले. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणीही राहुल गांधींनी केंद्राकडे केली.