आज देशातील विविध ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी दौऱ्यावर असून तेलंगणामध्ये बोलताना त्यांनी विरोधकांवर खोचक शब्दांमध्ये टोला लगावला. तसेच, तेलंगणामधील सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करतानाच राज्यात लवकर कमळ फुलेल, असंही मोदी म्हणाले. तेलंगणाच्या रामगुंडम भागातील बियाणांच्या प्रकल्पाचं यावेळी मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. तसेच, तेलंगणामध्ये लवकरच अनेक विकासकामं होणार असल्याची घोषणा मोदींनी केली.

“त्याच पक्षानं तेलंगणाला सर्वाधिक फसवलं!”

तेलंगणाच्या बागमपेटमध्ये झालेल्या कार्यक्रमात मोदींनी तेलंगणा राष्ट्र समितीला उद्देशून खोचक शब्दांत टोलेबाजी केली. “तेलंगणामधील जनता ज्या राजकीय पक्षावर सर्वाधिक विश्वास ठेवतात, त्याच पक्षानं तेलंगणाची सर्वात मोठी फसवणूक केली आहे. पण जेव्हा जेव्हा अंधार वाढू लागतो, त्या परिस्थितीत कमळ फुलत असतं. तेलंगणामध्येही कमळ फुलताना दिसेल”, असं मोदी म्हणाले.

“तेलंगणाच्या सत्ताधाऱ्यांनी राज्यावर अन्याय केला”

दरम्यान, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेलंगणामधील सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. “तेलंगणाच्या नावावर जे मोठे झाले, सत्तेत आले त्यांनीच राज्याला मागे ढकललं. तेलंगणा सरकार आणि तेलंगणामधील नेत्यांनी राज्याच्या क्षमतांवर आणि लोकांच्या कौशल्यावर अन्याय केला आहे”, असं मोदी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Video: “आपल्या राष्ट्रपती कशा दिसतात?” तृणमूलच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान; व्हिडीओ व्हायरल!

शिव्यांचा आहार!

यावेळी बोलताना मोदींनी उपहासात्मक शब्दांमध्ये विरोधकांना टोला लगावला. “मी आज सकाळी दिल्लीत होतो. नंतर कर्नाटक, तमिळनाडूमध्ये होतो. रात्री आंध्र प्रदेशमध्ये असेन. आत्ता तेलंगणामध्ये आहे. लोक मला विचारतात तुम्ही थकत नाहीत का? मी त्यांना समजावलं की हे बघा.. मी रोज दोन-तीन किलो शिव्या खातो. परमात्म्यानं माझ्यामध्ये अशी रचना केली आहे, की या सगळ्या शिव्या माझ्यामध्ये प्रक्रिया होऊन जीवनसत्वांमध्ये रुपांतरीत होतात. एक सकारात्मक ऊर्जा तयार होते”, असं मोदी म्हणाले.