Operation Sindoor India Pakistan News Updates : पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याविरोधात भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानवर हवाई हल्ले करून त्यांचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानचा चहूबाजूने नायनाट सुरू असतानाच पाकिस्तानने भारताशी संपर्क साधला होता, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपल्या भाषणात म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “दहशतवाद्यांनी आपल्या माता भगिनींचं कुंकू पुसलं होतं. त्यामुळेच भारतानं दहशतीची ही मुख्यालयं उद्ध्वस्त केली. या कारवाईत १०० हून अधिक क्रूरकर्मा दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. दहशतवाद्यांचे खूप सारे म्होरके खुलेआम पाकिस्तानात फिरत होते. भारताविरोधात कारवाया करत होते. त्यांना भारतानं एका झटक्यात संपवलं. भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान घोर निराशेच्या गर्तेत गेला होता. गडबडला होता. याच गोंधळात त्यानं आणखी एक चूक केली. दहशतवादविरोधी कारवाईत भारताची मदत करण्याऐवजी भारतावरच हल्ला करायला सुरुवात केली.”
पहिल्या तीन दिवसांतच भारताने पाकिस्तानला उद्ध्वस्त केलं
“पाकिस्ताननं आपल्या शाळा, कॉलेज, गुरुद्वारे, मंदिरं, सामान्य नागरिकांच्या घरांना लक्ष्य केलं. पाकिस्ताननं आपल्या लष्करी तळांना लक्ष्य केलं. पण यातही पाकिस्तान स्वत: उघडा पडला. जगानं पाहिलं की कशा प्रकारे पाकिस्तानचे ड्रोन, क्षेपणास्त्रं भारतासमोर निष्प्रभ झाले. भारताच्या सक्षम एअर डिफेन्स सिस्टीमनं त्यांना हवेतच उद्ध्वस्त केलं. पाकिस्तानची तयारी सीमेवर वार करण्याची होती. पण भारतानं पाकिस्तानच्या छातीवरच वार केला. भारताचे ड्रोन, क्षेपणास्त्रांनी अचूक लक्ष्यभेद केला. पाकिस्तानी वायूदलाच्या तळांना लक्ष्य केलं. या तळांवर पाकिस्तानला मोठा गर्व होता. भारतानं पहिल्या तीन दिवसांतच पाकिस्तानला एवढं उद्ध्वस्त केलं, ज्याचा अंदाज पाकिस्तानलाही नव्हता. त्यामुळे भारताच्या आक्रमक मोहिमेनंतर पाकिस्तान वाचण्याचे मार्ग शोधू लागला”, असा घटनाक्रमच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितला.
पाकिस्तानने भारताशी संपर्क केला
ते पुढे म्हणाले, “पाकिस्तान जगभरात तणाव कमी करण्यासाठी देशांकडे साकडं घालू लागला. सगळीकडे अपयशी ठरल्यानंतर नाईलाजाने १० मे रोजी दुपारी पाकिस्तानी लष्करानं आपल्या डीजीएमओंना संपर्क केला. तोपर्यंत आपण दहशतवादी व्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त केलं होतं. दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. पाकिस्तानमध्ये बसलेल्या दहशतवादी तळांना आपण उद्ध्वस्त केलं. त्यामुळे पाकिस्तानकडून जेव्हा हे म्हटलं गेलं की त्यांच्याकडून यापुढे कोणतीही दहशतवादी कारवाई किंवा लष्करी कारवाई केली जाणार नाही. तेव्हा भारतानंही त्यावर विचार केला.”
“मी पुन्हा सांगतो, आपण पाकिस्तानच्या दहशतवादी व लष्करी तळांवरील आपली कारवाई फक्त स्थगित केली आहे. येत्या काही दिवसांत आपण पाकिस्तानच्या हालचाली या निकषांवर पाहू की ते काय पाऊल उचलतात. भारताच्या तिन्ही सैन्यदलांनी, एअर फोर्स, आर्मी आणि नौदलानं, आपली बीएसएफ, निमलष्करी दल सातत्याने सतर्क आहेत. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकनंतर आता ऑपरेशन सिंदूर हेच दहशतवादाविरोधात भारताचं धोरण आहे”, असंही मोदी म्हणाले.