पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील भाजपाच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी भाजपा आणि जनसंघ यांनी दिल्लीसाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला. तसंच २०१४ पूर्वी असलेल्या कररचनेवरुन काँग्रेसवर जोरदार टीका केली केली. सध्या विरोधी पक्षात बसलेल्या काँग्रेसने कायमच जनहिताच्या विरोधात काम केलं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आपण जीएसटीचे दर कमी केले तर हिमाचलमधल्या काँग्रेस सरकारने सिमेंटचे दर वाढवले अशी टीकाही मोदी यांनी केली.
काय म्हणाले नरेंद्र मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “भाजपाच्या स्थापनेला ४५ वर्षे झाली आहेत. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, नानाजी देशमुख, मुरली मनोहर जोशी, राजमाता विजयाराजे सिंधिया या आणि अशा अनेक व्यक्तिमत्त्वांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या परिश्रमांमुळे आज भाजपाचा वटवृक्ष झाला आहे. या पक्षाचं बीज १९५१ मध्ये रोवण्यात आलं होतं. त्यावेळी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जींच्या नेतृत्वात जनसंघाची स्थापना झाली त्यावेळी दिल्ली जनसंघाचे अध्यक्ष वैद्य गुरुदत्त होते.” अशी आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितली.
दिल्लीबाबत काय म्हणाले नरेंद्र मोदी?
दिल्ली आणि भाजपाचं नातं खूप जुनं आहे. सेवा, संस्कार आणि सुख-दुःखाचं साथीदार असलेलं हे शहर आहे. जनसंघ आणि नंतर भाजपाच्या रुपाने आपला पक्ष दिल्लीशी कायमच जोडला गेला आहे. १९८४ मध्ये शिखांचं शिरकाण करण्यात आलं त्यावेळी दिल्लीच्या आत्म्यावरच जणू प्रहार झाला. ते शिरकाण म्हणजे दिल्लीच्या हृदयावर कोरलेली जखम ठरली. त्यावेळी दिल्ली भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शिख बांधवांचं शक्य तेवढं रक्षण केलं. दिल्ली आणि भाजपा यांचं नातं हे विश्वासाचं आणि भावनेचं आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
काँग्रेसवर जोरदार टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात पुढे म्हणाले, २०१४ च्या पूर्वी काँग्रेसची सत्ता होती. त्यावेळी देशात २ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तरीही कर द्यावा लागायचा अशी कररचना होती. आपलं सरकार आल्यानंतर आपण १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त केलं त्यावर शून्य कर लागतो. कांग्रेसने कायमच जनहिताच्या नुसत्या घोषणा दिल्या. पण त्या सगळ्या पोकळ ठरल्या कारण त्यांनी काहीच काम केलं नाही. हिमाचल प्रदेशातलंच उदाहरण बघा. आपण जीएसटीचे दर कमी केले तर हिमाचलच्या सरकारने तिथल्या सिमेंटच्या किंमती वाढवल्या. लोकांना फायदा होण्यापेक्षा काँग्रेसला त्यांच्या तिजोऱ्या भरण्यात जास्त रस आहे. त्यामुळे लोकांनी त्यांना ओळखलं आहे असंही मोदी म्हणाले.