पुलवामा हल्ल्यानंतर आतंरराष्ट्रीय पातळीवर भारताने मुसक्या आवळायला सुरूवात केल्यानंतर पाकिस्तानला सुबुद्धी आठवायला सुरूवात झाली आहे. भारताच्या कारवाईच्या भीतीनं दहशतवादी मसूद अजहरच्या मुसक्या आवळण्यास पाकिस्तान सरकारनं सुरुवात केल्याचे वृत्त आहे. पंजाब प्रांतातील बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय पाकिस्तान सरकारने ताब्यात घेतलं आहे.
बहावलपूरमधील मदरसातूल साबिर आणि जामा ए मशिद सुभानल्लामधील मसूदच्या जैश ए मोहम्मदचं मुख्यालय पंजाब सरकारने आपल्या ताब्यात घेतलं आहे. ही माहिती पंजाब सरकारच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. या मुख्यालयात ७० शिक्षक आणि ६०० विद्यार्थी आहेत. सध्या पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे पोलीस मुख्यालयाच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. मौलाना मसूद अजहरदेखील याच मुख्यालयात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुलवामा हल्ल्याप्रकरणी भारतीय सैन्य कारवाई करु शकतं, अशी भीती पाकिस्तानला वाटत असल्यामुळे जैशच्या मुख्यालयाला कडेकोट सुरक्षा पुरवण्यात आल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियातून येत आहेत.
पाकिस्तानातील प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, जैशच्या मुख्यालयाशी संबंधित असलेली प्रकरणं हाताळण्यासाठी पाकिस्तान सरकारने एका प्रशासकाची नियुक्ती केली आहे. याबद्दलचा निर्णय गुरूवारी राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर घेण्यात आला आहे.
१४ फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरमधील पुलवामात झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात भारताच्या ४३ जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए मोहम्मदनं घेतली होती. या आत्मघाती हल्ल्यानंतर भारतात एकच संतापाची लाट उसळली होती तर जगभरातील प्रमुख देशांनी भारताला कारवाईसाठी पाठींबा दर्शवला होता. जागतिक दबावमुळे पाकिस्तान चांगलेच गांगरल्यामुळे दहशतवादावर कारवाई सुरू केली आहे. गुरुवारीच पाकिस्तानने मुंबई हल्ल्याचा सुत्रधार हाफीज सईद याच्या जमात-उद-दावा आणि त्याची धर्मादाय संस्था फलह-ए-इन्सानियत या संघटनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.