गेल्या काही वर्षांत केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षांची तयारी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परंतु, युपीएससीची परीक्षा देणारे विद्यार्थी वेळेचा अपव्यव करतात असं विधान पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य आणि अर्थशास्त्रज्ञ संजीव सन्याल यांनी केलंय. ते 'द निऑन शो'च्या पॉडकास्ट'मध्ये बोलत होते. हिंदुस्तान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. “मला वाटतं की ज्यांच्याकडे खूप ऊर्जा आहे, ते UPSC क्रॅक करण्याच्या प्रयत्नात आपला वेळ वाया घालवत आहेत. प्रत्येक देशाला नोकरशाहीची गरज असते, त्यामुळे अशी परीक्षा घेणे अगदी योग्य आहे. परंतु मला वाटते की लाखो लोक त्यांची महत्त्वाची वर्षे घालवतात. कारण हजारो लोकांपैकी फार कमी लोकांना नोकरी मिळते. त्याला काही अर्थ नाही. जर तीच उर्जा आणखी काही करण्यात वाया घालवली तर आपण अधिक ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकू, चांगले चित्रपट, चांगले डॉक्टर, अधिक शास्त्रज्ञ आणि असे बरेच काही मिळवू”, असं संजीव संन्याल म्हणाले. ते पुढे म्हणाले, “जर एखाद्याला खरोखरच प्रशासक बनायचं असेल तरच त्याने अशा परीक्षा द्याव्यात. नोकरशाहीतील जीवन हे प्रत्येकासाठी नसते. तुम्हाला ते खरोखर करायचे असेल तरच तुम्ही आनंदी व्हाल.” “इलॉन मस्क किंवा मुकेश अंबानी होण्याचे स्वप्न पाहावे. जॉइंट सेक्रेटरी होण्याचे स्वप्न का पाहताय?” असाही प्रश्न त्यांनी विचारला. समाजातील वाईट नेते हे त्या समाजाच्या आकांक्षेचे प्रतिबिंब असतात, अशी टिप्पणी सन्याल यांनी केली.