5G इंटरनेट सर्व्हिसच्या दिशेने आजचा दिवस खूपच महत्त्वपूर्ण आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या रौप्य महोत्सवी वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ५जी टेस्ट बेड लाँच केले. हे ५जी टेस्ट बेड प्रकल्प आयआयटी मद्रासच्या नेतृत्वाखालील ८ संस्थांनी संयुक्तपणे तयार केला आहे.

या कार्यक्रमाला मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भारताचे जगातील सर्वात मोठे मोबाइल उत्पादन केंद्र म्हणून वर्णन करताना, पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील मोबाइल उत्पादन युनिट्सची संख्या २ वरून २०० हून अधिक झाली आहे.

५जी टेस्ट बेड टेशच्या टेलिकॉम उद्योगाला आणि स्टार्टअपला खूप मदत करेल. याद्वारे, उद्योग आणि स्टार्टअप ५व्या आणि पुढच्या पिढीतील उत्पादने, प्रोटोटाइप आणि सोल्यूशन्स प्रमाणित करू शकतील. या प्रकल्पाची किंमत २२० कोटी रुपये आहे.

आयआयटी दिल्ली, आयआयटी हैदराबाद, आयआयटी मुंबई, आयआयटी कानपूर, आयआएससी बंगलोर, सोसायटी ऑफ अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग अँड रिसर्च (SAMEER) आणि सेंटर ऑफ एक्सलन्स इन वायरलेस टेक्नॉलॉजी (CEWit) यांनी ५जी टेस्ट बेड विकसित करण्यासाठी एकत्र काम केले आहे आणि याचे नेतृत्त्व आयआयटी मद्रास करत आहे.

ट्रायला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधानांनी जगात भारताच्या मोबाइल उत्पादनाच्या वर्चस्वाचाही उल्लेख केला. पीएम मोदी म्हणाले की, भारत सध्या जगातील सर्वात मोठे मोबाइल उत्पादन केंद्र आहे. यासोबतच पंतप्रधान म्हणाले की, आता देशातील मोबाईल उत्पादन युनिट्सची संख्या २ वरून २०० हून अधिक झाली आहे.