पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीत पोहोचले होते. यावेळी चरणजीत सिंह आणि अमित शाह यांच्यात चर्चा झाली. चर्चेदरम्यान चरणजीत सिंह यांनी उत्तर प्रदेशात शेतकरी कायद्यावरुन झालेल्या हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित केला. भेटीनंतर चरणजीत सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. "मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असून तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली. तसंच ड्रग्ज आणि शस्त्रांची तस्करी थांबवण्यासाठी पंजाबला जोडून असणाऱ्या आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याचीही मागणी केली आहे," अशी माहिती चरणजीत सिंग चन्नी यांनी दिली. "उत्तर प्रदेशात झालेल्या निर्घृण हत्या सहन केल्या जाणार नाहीत असंही मी त्यांना सांगितलं आहे. आपल्या नेत्यांना अटक करण्याची ही पद्धत बंद झाली आहे. कर्तारपूर कॉरिडोअर लवकरात ललकर सुरु करावं अशी विनंती केली आहे. सरकारच लवकरच निर्णय घेईल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे," असं चरणजीत सिंग चन्नी यांनी सांगितलं. दरम्यान दिल्लीला जाण्याआधी चंदिगडमध्ये बोलताना ते म्हणाले होते की, "हे तीन कृषी कायदे लवकरात लवकर रद्द केले पाहिजेत आणि लखीपमपूर खेरीसारख्या घटना टाळल्या पाहिजेत. मी हा मुद्दा अमित शाह यांच्यासमोर आजच्या बैठकीत मांडणार आहे". उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. चरणजीत सिंग चन्नी यांना उत्तर प्रदेशचा दौरा करण्याची परवानगी नाकारण्यात आल्यानंतर अमित शाह यांच्यासोबत ही भेट झाली. चरणजीत सिंग चन्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेतली असून लखीमपूर खेरी हिंसाचारातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी उत्तर प्रदेश सरकारवल दबाव आणावा अशी मागणी केली. तसंच कृषी कायदे रद्द करण्याचाही पुनरुच्चार केला.