आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते हिमंता बिस्वा सरमा हे संधी मिळेल तेव्हा काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर प्रखर टीका करत असतात. नुकतेच त्यांनी राहुल गांधीवर टीका करताना म्हटले की, ते आपल्या आई सोनिया गांधी यांचे अजिबात ऐकत नाहीत. तसेच सोनिया गांधी या राहुल गांधींना घाबरतात. आपल्या आईचे म्हणणे नाकारताना मी स्वतः पाहिले आहे, असेही सरमा म्हणाले. टाइम्स नाऊ वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी याचा खुलासा केला. “एखादा मुलगा घरात जेव्हा गोंधळ घालतो, टेबल वैगरे तोडतो, त्याला तर घरातले सर्व घाबरतात”, असेही ते यावेळी म्हणाले.

राहुल गांधी आपल्या आईचं म्हणणं का ऐकत नाहीत? असा प्रश्न विचारल्यानंतर सरमा म्हणाले की, हा संशोधनाचा विषय आहे. माध्यमांनीच याचा शोध घेतला पाहीजे. मी राहुल गांधींना कधीच सरळ अवस्थेत पाहिलेले नाही, असाही एक गंभीर आरोप हिमंता बिस्वा सरमा यांनी केला. विशेष म्हणजे हिमंता बिस्वा सर्मा हे दोन दशक काँग्रेसमध्ये होते. तरुण गोगोई यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी १५ वर्ष मंत्री म्हणून कारभार पाहिला. मात्र राहुल गांधी यांच्याशी झालेल्या वादातून त्यांनी २०१५ साली भाजपात प्रवेश केला.

काँग्रेसची मोठी खेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात उतरविला भाजपाचा माजी नेता

भाजपात प्रवेश केल्यापासून हिमंता सरमा यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. आसामच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आम्ही राहुल गांधींना भेटण्यासाठी गेलो होतो. तेव्हा राहुल गांधी आपल्या कुत्र्याला बिस्किट चारण्यात मग्न होते. त्यानंतर तेच बिस्किट त्यांनी आम्हाला खाण्यासाठी दिले, असा आरोप सरमा यांनी २०२२ साली एक्स अकाऊंटवरून केला होता.

ऑक्टोबर २०१७ साली राहुल गांधी यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी आपल्या कुत्र्याला बिस्किट भरवत असल्याचे दिसत आहे. या पोस्टवरही सरमा यांनी खोचक प्रतिक्रिया दिली होती. “सर, प्रसंग माझ्यापेक्षा चांगला कुणालाच माहीत नसेल. मला आजही आठवतंय, आम्ही आसामच्या महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आलो होतो, तेव्हा तुम्ही कुत्र्याला बिस्किट भरविण्यात व्यस्त होतात.

“एवढ्याश्या कारणावरून मला ट्रोल केलं जातं…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितली व्यथा

याआधी एकदा टीका करताना सरमा यांनी राहुल गांधींना अहंकारी असल्याचे म्हटले होते. त्यांना नेता – कार्यकर्ता असे नाते नको असते, तर त्यांना मालक-चाकर असे नाते हवे असते, असेही ते म्हणाले. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते एकदा म्हणाले, “मी राहुल गांधी यांचा ऋणी आहे. त्यांनी मला काँग्रेसमधून काढून टाकले नसते तर मी आज आसामचा मुख्यमंत्री झालो नसतो. मला राज्याची सेवा करता आली नसती.” २०२१ साी हिमंता बिस्वा सरमा यांनी आसामचे १५ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.