scorecardresearch

मोदी आडनाव अवमानावरून राहुल गांधी दोषी, दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाले…

भाजपा आमदाराने केलेल्या याचिकेवर ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

rahul gandhi
मोदी आडनाव अवमानावरून राहुल गांधी दोषी, दोन वर्षांची सुनावल्यानंतर पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाले…

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुजरातमधील सुरत येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने २ वर्षाची ही शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर न्यायालयाने राहुल गांधींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. याप्रकरणावर राहुल गांधींनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राहुल गांधी कर्नाटक दौऱ्यावर होते. कोलार येथील एक सभेत बोलताना ‘सर्व चोरांची आडनावं मोदी कशी काय असतात?’ असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला. या वक्तव्यावरून भाजपा आमदार पूर्णेश मोदी यांनी त्यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला. राहुल गांधींनी संपूर्ण मोदी समुदायाचा अपमान केल्याचं पूर्णेश मोदी यांनी म्हटलं.

हेही वाचा : अमित शहांच्या ‘त्या’ वक्तव्याची सीबीआयने चौकशी करावी; राहुल गांधींच्या बचावासाठी काँग्रेसचा भाजपावर प्रतिहल्ला

यावर आज ( २३ मार्च ) सुरत जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयात राहुल गांधीही पोहचले होते. तेव्हा न्यायालयाने राहुल गांधींना तुम्हाला काही मत मांडायचं आहे का? असं विचारलं. त्यावर ‘मी सातत्याने भ्रष्टाचाराविरोधात बोललो आहे. कोणाच्या विरोधात जाणूनबुजून बोललो नाही. त्याने कोणाचंही नुकसान झालं नाही,’ असं राहुल गांधींनी म्हटलं. याप्रकरणावर निकाल देताना कलम ५०४ अन्वये न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच, त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला आहे.

“सत्य हे माझे ध्येय आहे अन्…”

यानंतर आता राहुल गांधींनी ट्वीट केलं आहे. राष्ट्रपिता महत्मा गांधी यांचं एक वाक्य शेअर केलं आहे. “माझा धर्म सत्य आणि अहिंसेवर आधारित आहे. सत्य हे माझे ध्येय आहे आणि अहिंसा माझे साधन आहे,” असं राहुल गांधींनी ट्वीटमध्ये सांगितलं आहे.

हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली ६ व्हिजन डॉक्युमेंटची घोषणा, म्हणाले, “भारत आज …”

तर, प्रियंका गांधी-वाड्रा यांनीही ट्वीट करत केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. “घाबरलेलं सरकार साम, दाम, दंड, भेद वापरून राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पण, माझा भाऊ कधी घाबरला आणि घाबरणारही नाही… सत्य बोलत आलो आणि सत्य बोलतच राहणार. देशातील जनतेचा आवाज बुलंद करत राहू… करोडो देशवासीयांचं प्रेम राहुल गांधींच्या पाठीशी आहे,” असं प्रियंका गांधींनी ट्वीट करत म्हटलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 14:57 IST

संबंधित बातम्या