Rahul Gandhi react to Desh ka raja kaisa ho Rahul Gandhi jaisa ho slogans Video : देशाची राजधानी दिल्लीत शनिवारी काँग्रेस पक्षाच्या एका हाय-प्रोफाईल लीगल कॉन्क्लेव्हमध्ये राहुल गांधी यांचं जोरदार स्वागत झालं. यावेळी देण्यात आलेल्या घोषणांची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. राहुल गांधी जेव्हा या कार्यक्रमात व्यासपीठावर बोलण्यासाठी आले तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांनी जोर-जोरात ‘देश का राजा कैसा हो, राहुल गांधी जैसा हो’ अशा घोषणा देण्यास सुरूवात केली. ही घोषणा ऐकताच राहुल गांधी यांनी घोषणा देणाऱ्यांना तात्काळ थांबवलं आणि शांतपणे त्यांना समजावून सांगितले.

राहुल गांधी ‘कॉन्स्टिट्युशनल चॅलेंजेस: परस्पेकटिव्ह अँड पाथवेज’ या कार्यक्रमात बोलण्यासाठी व्यासपीठावर येताच, पक्षाचे कार्यकर्ते ” देश का राजा कैसा हो, राहुल गांधी जैसा हो ” अशा घोषणा देऊ लागले. यावर राहुल गांधी म्हणाले की, “नाही… नाही… नाही… मी राजा नाहीये आणि मला राजा बनायचे देखील नाही. मी राजा या संकल्पनेच्या विरोधात आहे.”

यानंतर राहल गांधी यांनी या व्यासपीठावरून भारतीय निवडणूक आयोगावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूकीत घोटाळा झाल्याचा आरोप केला. तसेच त्यांनी भारताची निवडणूक व्यवस्था अधीच मृत झाल्याचे देखील म्हटले.

राहुल गांधींचे गंभीर आरोप

“सत्य हे आहे की भारतातील निवडणूक व्यवस्था आधीच मृत झाली आहे. पंतप्रधान खूपच कमी बहुमताने पदावर आहेत. जर १५ जागांवर घोटाळा असेल- आणि आमचा संशय आहे की हा आकडा ७० ते ८० हून जास्त आहे- तर ते भारताचे पंतप्रधान बनले नसते, असा दावा राहुल गांधी यांनी यावेळी केला. जेव्हा आम्ही ही आकडेवारी जाहीर करू तेव्हा निवडणूक व्यवस्थेतीन शॉकव्हेव गेल्याचे तुम्हाला दिसेल. हे अक्षरश: अणुबॉम्बसारखे असेल,” असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांनी असाही आरोप केला की काँग्रेसने केलेल्या सहा महिन्यांच्या चौकशीत मोठ्या प्रमाणात निवडणूक घोटाळा उघडकीस आला. कर्नाटकातील एका विधानसभा जागेचा उल्लेख करत राहुल गांधींनी दावा केला की ६.५ लाख मतदारांपैकी १.५ लाख मतदार बनावट होते. “आम्ही जेव्हा ही माहिती जाहीर करू तेव्हा निवडणूक व्यवस्थेत होणारा धक्का तुम्हाला दिसेल. हे अक्षरशः अणुबॉम्बसारखे आहे,” असे ते म्हणाले.

राहुल गांधी यांनी आरोप केला ही निवडणूक आयोग हा नष्ट करून ताब्यात घेण्यात आला आहे. “आमच्याकडे असे काही पुरावे आहेत जे संपूर्ण देशाला दाखवून देतील की निवडणूक आयोग ही संस्थाच अस्थित्वात नाही. ते गायब झाली आहे,” असा दावाही त्यांनी पुढे बोलताना केला.