कोलकाता येथे उड्डाणपूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन जणांचे मृतदेह सापडले असून, मृतांची संख्या आता २६ झाली आहे. आज सकाळी मदतकार्य सुरू करण्यात आले असून, कोलकाता पोलिसांच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने अग्निशमन दलाच्या जवानांसह मदतकार्य करताना ढिगारे उपसले असता दोन जणांचे मृतदेह सापडले. घटनास्थळी एक मंदिर होते. त्यावर पूल कोसळला. तेथे हे मृतदेह सापडले असे कोलकात्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी कोलकाता मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यांच्या समवेत प्रदेशाध्यक्ष अधीर चौधरी व काँग्रेस नेत्या दीपा दासमुन्शी हे होते.
या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची संख्या ८९ झाली आहे. निवासी इमारतींच्या नजीकही पुलाचा काही भाग कोसळला असून, तेथे कुजल्याचा वास येत असून मदतकार्य करताना काळजी घ्यावी लागत आहे. एक चुकीचे पाऊल हे पुढच्या दुर्घटनेस कारण ठरू शकते. दोन मृतांची ओळख पटली किंवा नाही याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, की त्यांचे कपडे बघितले असता ते मंदिराबाहेरचे भिकारी होते असे दिसते. वास येत असल्याने अजून मृतदेह ढिगाऱ्याखाली आहेत व त्यांना काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. ३१ मार्च रोजी बांधकाम चालू असलेल्या विवेकानंद उड्डाणपुलाचा ६० मीटरचा भाग कोसळला होता. पश्चिम बंगाल सरकारने याबाबत उच्चस्तरीय चौकशी सुरू केली असून, विरोधकांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर या प्रकरणी दोषारोप केले आहेत. दरम्यान, हैदराबाद येथील आयव्हीआरसीएल या कंपनीच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
भाजपची राहुल यांच्यावर टीका
नवी दिल्ली : कोलकातामध्ये पूल कोसळला त्या ठिकाणाला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भेट दिल्याबद्दल भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे. माध्यमांमध्ये या भेटीची छायाचित्रे प्रसिद्ध व्हावीत हा त्यांचा हेतू असून तीच गांधी यांच्या राजकारणाची जीवनरेखा आहे, असे भाजपने म्हटले आहे.