Raja Raghuvanshi Murder Case Latest News: गेल्या काही दिवसांपासून इंदोर येथील राजा रघुवंशी याच्या हत्येचे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. या प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. आता मेघालय पोलिसींनी आज पुन्हा एकदा मोठा खुलासा गेला आहे. राजा रघुवंशीची पत्नी सोनम आणि तिच्या साथीदारांनी त्याच्या हत्येचा तीन वेळा प्रयत्न केला होता. अखेर चौथ्या वेळी ते हत्या करण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी सांगितले की ही हत्येचा संबंध लग्नाच्या आधीच्या नात्याशी असून सोनमने सांगितले की तिचे राजा याच्याबरोबर बळजबरीने लग्न लावून देण्यात आले होते.
राजा याची मेघालयमध्ये सोनम आणि तिचे साथिदार राज कुशवाह, विशाल चौहान, अकाश राजपूत आणि आनंद कुर्मी यांनी एका निर्जन स्थळी हत्या केली होती. त्यानंतर त्यांनी त्याचा मृतदेह एका दरीत टाकून दिला. दरम्यान या पाचही आरोपींनी हत्येची कबुली दिली आहे, असेही पोलिसांनी सांगितले.
सोनमच्या प्लॅनबद्दल पोलिसांनी काय सांगितले?
पोलिसांनी सांगितले की, सोनम आणि राजा यांचे लग्न होण्याच्या फक्त ११ दिवस आधी इंदोर येथे या हत्येचे योजना आखण्यात आली. या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार हा राज असून त्याचे कथितपणे सोनम बरोबर प्रेमसंबंध होते आणि राजा याचा अडथळा दूर करण्यासाठी त्याच्या मित्रांनी त्याला मदत करण्याची तयारी दाखवली. तपासात असेही आढळून आले आहे की, राजा याच्या हत्येची योजना आखल्यानंतर हे सर्वजण सोनमच्या आधी गुवाहाटी येथे दाखल झाले होते.
पण सतत लॉजिस्टिक संबंधीत अडचणी आल्याने त्यांना त्यांची योजना पूर्ण करता आली नाही. गुवाहाटी येथे त्यांचा पहिला प्रयत्न अपयशी ठरला, त्यानंतर पुढचे दोन प्रयत्न नोंग्रियट, मावलाख्यात आणि वेइसावडोंग दरम्यान अयशस्वी झाले. चौथ्या प्रयत्नात वेइसावडोंग धबधब्याजवळ त्यांनी राजा याची हत्या केली. पाचही आरोपी त्यानंतर घटनास्थळाहून पळून गेले, ज्यापैकी एकाने सोनमचा रेनकोट घातला होता.
फेब्रुवारीपासून योजना आखली जात होती…
सोनम आणि राज हे लग्न होण्यापासून रोखण्यासाठी फेब्रुवारीमध्ये प्लॅन करत होते असेही पोलिसांनी सांगितले. त्यांनी सोनमचा नदीत अपघाती मृ्त्यू झाल्याचा बनाव रचण्याचा देखील विचार केला होता. इतकेच नाही तर एका अनोळखी व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह स्कूटीवर ठेवून जाळून ती सोनम असल्याचे दाखवण्याचाही त्यांनी विचार केला होता.
जेव्हा या योजना प्रत्यक्षात येऊ शकल्या नाहीत, तेव्हा आरोपींनी लग्न होईपर्यंत वाट पाहण्याचा आणि नंतर राजाला संपवण्याचा निर्णय घेतला असे पोलिसांचे म्हणणे आहे.