एक्स गर्लफ्रेंडचे दुसऱ्याबरोबर लग्न होणार होते. विवाह मंडपात लग्नाचे विधी सुरु होते. तितक्यात एक्स बॉयफ्रेंड तिथे पोहोचला व त्याने थेट नवरदेवाचे व त्याच्या भावाचे अपहरण केले. राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यातील भाटा गावात मंगळवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. एखाद्या बॉलिवूड सिनेमाला शोभावा असा हा प्रसंग होता. जालम सिंह असे मुख्य आरोपीचे नाव असून त्याने साथीदारांच्या मदतीने मिळून हे कृत्य केले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केल्यानंतर त्यांनी बुधवारी नवरदेवाला आणि त्याच्या भावाला जासोल भागामध्ये सोडून दिले. नगर गावात राहाणारा नरपत सिंह वरात घेऊन वधूच्या भाटा गावात पोहोचला. त्याचवेळी जालन सिंह आपल्या साथीदारांसह तिथे दाखल झाला. त्याने नरपत सिंह आणि त्याचा भाऊ गणपत सिंह यांचे अपहरण करण्याआधी वरातीमधील वऱ्हाडी मंडळींना मारहाण केली. काही पाहुणेमंडळी या मारहाणीत जखमी झाली असून त्यांच्यावर सिंधारी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बुधवारी सकाळी नवरदेवाच्या वडिलांनी सिंधारी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवल्यानंतर आरोपींचा शोध सुरु झाला. तपासामध्ये वधूचे जालम सिंह बरोबर प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. नरपत सिंह बरोबर लग्न ठरल्यानंतर तिने जालम सिंह बरोबरचे प्रेमसंबंध संपवले. पण जालम सिंहला तिचा हा एकतर्फी निर्णय मान्य नव्हता. लग्नाच्यावेळी कुठला वाद नको म्हणून मुहूर्ताला प्राधान्य न देता लग्नाची तयारी सुरु केली. पण जालम सिंहला कुठूनतरी लग्नाचा दिवस आणि वेळ समजली. त्यानंतर आरोपीने थेट लग्न मंडपात घुसून नवरदेवाचे अपहरण केले. पोलीस आता मुख्य आरोपीचा शोध घेत असून कलम ३२३, ३४१, ३६५, ३६४ अ आणि ३८२ अंतर्गत आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan jilted lover breaks into ex lovers wedding kidnap groom barmer bhata village dmp
First published on: 01-08-2019 at 12:34 IST