करोना व्हायरसच्या प्रादुर्भव रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेकांना लग्न जमवताना अडचण निर्माण होत आहे. अशातच कानपूरमध्ये राहणाऱ्या अनिल आणि नीलमने सात जन्माच्या गाठी बांधल्या आहेत. कानपूरमध्ये झालेलं हे लग्न उत्तर प्रदेशमध्ये सध्या चर्चेचा विषय असून नेटकरी दोघांचंही कौतुक करत आहेत. पाहूयात अनिल आणि नीलमच्या प्रेमाची अजब गोष्ट…

आई-वडिलांचे निधन झाल्यामुळे नीलम भाऊ आणि वहिनीकडे राहत होती. कालांतराने नीलमकडून मोलकरीसारखं घरातील सर्व काम करून घेतलं जाऊ लागलं. छोट्या-छोट्या गोष्टीवरून तिला मारहाण होत होती. अखेर नीलमने घर सोडलं. असाहाय्य आणि निराधर झालेली नीलम कानपूरमधील काकादेव परिसरातील नीर-छीर चौकात असणाऱ्या भिखाऱ्यासोबत राहू लागली.

आधीच संकटात असणाऱ्या नीलमच्या आयुष्यात लॉकडाउननंतर आणखी संकट घेऊन आलं. पोटापुरती मिळणारं जेवणंही लॉकडाउनमुळे बंद झालं होतं. उपासमारीची वेळ आली होती. याचदरम्यान कानपूरमधील लालता प्रसाद यांची भेट नीलमसोबत झाली. लालता प्रसाद यांनी ड्राव्हर असणाऱ्या अनिलला नीलमसह इतरांनाही दररोज न चुकता जेवण देण्याचा आदेश दिला. सलग ४५ दिवस अनिल नीलमसह तेथे असणाऱ्या सर्वांना जेवण देत होता. याचदरम्यान नीलम आणि अनिलमध्ये प्रेमाचा अंकुर फुलला.

हळूहळू दोघेही प्रेमात अखंड बुडाले आणि ही गोष्ट अनिलच्या वडिलांना समजली. अनिलच्या वडिलांनी नीलमसोबत लग्नाची बोलणी केली. लग्नाची विचारणा झाल्यानंत नीलमनेही झटक्यात होकार दिल. काही दिवसांत लगेच दोघांच्या सहमतीने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अनिल आणि नीलमचा विवाह झाला.