जवळपास दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारताची सर्वात मोठी ‘विक्रमादित्य’ युद्धनौका भारतीय नौदलात दाखल होण्यास सज्ज झाली आहे. रशियन बनावटीची ‘विक्रमादित्य’ युद्धनौका भारतीय नौदलातील सर्वात मोठी युद्धनौका आहे यात काहीच शंका नाही. परंतु, या युद्धनौकेने तयार होण्यासाठीही लागणाऱ्या कालावधीतही विक्रम केला आहे. काही प्राथमिक चाचण्या केल्यानंतर येत्या १५ नोव्हेंबर पर्यंत विक्रमादित्य युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे.
तयार होण्यासाठी लागणारा कालावधी, किमतीत वाढ आणि देवाण-घेवाण करार या सर्व वेळकाढू प्रक्रिया पूर्ण करून विक्रमादित्य युद्धनौकेचा भारतीय नौदलात दाखल होण्याचा मार्ग आता खुला झाला आहे. भारतीय नौदल विभागाकडून २००४ साली या युद्धनौकेची बनविण्याची ऑर्डर देण्यात आली होती. या युद्धनौका साकारणारे अभियंते आणि सेवमॅश शिपयार्डचे प्रमुख अधिकारी यांच्यानुसार विक्रमादित्य चाचणी दरम्यान सर्वाधिक ३० नॉट्स इतकी गती गाठेल अशी आशा व्यक्त केली आहे.