एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर पुन्हा एकदा टीका केली आहे. “त्यांना(मोदींना) असं वाटतं की त्यांना हलाल मांस, मुस्लीम टोपी, दाढी आणि मुस्लिमांच्या खाण्याच्या सवयींपासून धोका आहे. भाजपा ही मुस्लिमांच्या अस्मितेच्या विरोधात आहे. सबका साथ सबका विकास, सबका विश्वास हे पंतप्रधानांचे शब्द पोकळ आहेत. भारतातील विविधता आणि मुस्लीम ओळख संपवणे हा भाजपाचा खरा अजेंडा आहे.” असं ओवेसींनी म्हटलं आहे.

हेही वाचा – Gujarat Election : …म्हणून गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ‘एमआयएम’ उतरणार!

या अगोदर असदुद्दीन ओवेसींनी बिल्किस बानो आणि अंकिता हत्या प्रकरणावरुन भाजपा सरकारला लक्ष्य केलं होतं. मोदींनी गुजरातमधील अंबाजी येथे केलेल्या भाषणात महिलांचा सन्मान केल्याचा उल्लेख केला होता. ओवेसी यांनी त्यावरुनही मोदींवर टीका केली होती. “कृपया बिल्किस बानो आणि अंकिताच्या कुटुंबाला भेटा, त्यांना कदाचित तुम्हाला काहीतरी सांगायचं असेल,” असं ट्वीट ओवेसी यांनी केलं होतं.

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभांचा कार्यकाळ येणाऱ्या सहा महिन्यांच्या आत संपणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून नुकताच हिमाचल प्रदेशमधील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. तर गुजरातच्या निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर केलेला नाही. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष आता निवडणूक आयोग गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर करणार याकडे आहे. भाजपाचा गड समजल्या जाणाऱ्या गुजरातमधील निवडणुकीच्या रिंगणात भाजपा, काँग्रेससह अन्य पक्षही असणार आहेत. तर आता ‘एमआयएम’नेही गुजरात विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी ही माहिती दिली आहे. याशिवाय गुजरातमधील काही भाजपा खासदार संपर्कात असल्याचाही दावा जलील यांनी केला आहे.