Operation Sindoor Sania Mirza Reaction: भारतीय लष्कराने पहलगाम दहशवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून काल पाकिस्तानस्थित तहशतवाद्यांच्या तळांवर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून हवाई हल्ले केले. याची माहिती लष्कराच्या दोन महिला अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिल्यानंतर भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
बुधवारी सकाळी ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देताना कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्यासोबत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री होते. ऑपरेशन सिंदूर ही भारतीय लष्कर आणि हवाई दलाची संयुक्त कारवाई होती आणि त्यात पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला होता. सानिया मिर्झाने वेगवेगळ्या धर्मांच्या दोन महिला अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीचे सोशल मीडियावर कौतुक केले आहे.
सानिया मिर्झाने पत्रकार फेय डिसोझा यांची एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये कर्नल सोफिया आणि विंग कमांडर व्योमिका यांनी दिलेल्या ब्रीफिंगवर प्रतिक्रिया म्हणून डिसोझा यांनी, “या अतिशय शक्तिशाली फोटोमध्ये, एक देश म्हणून आपण कोण आहोत हे उत्तम प्रकारे दिसत आहे”, असे लिहिले होते. जी पोस्ट नंतर सानिया मिर्झाने शेअर केली आहे.
नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून करण्यात आलेली ही कारवाई २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर होते. पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी पलगाममध्ये केलेल्या हल्ल्यात एका नेपाळी नागरिकासह २६ जणांचा मृत्यू झाला होता.

सानिया मिर्झाला भारतातील सर्वात महान टेनिसपटू आणि महिला खेळाडूंपैकी एक मानले जाते. सानियाने भारतासाठी टेनिसमध्ये सहा ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकली आहेत. २०१५ मध्ये सानिया मिर्झाने जगातील दुहेरी खेळाडू म्हणून अव्वल स्थान मिळवले होते.
नवी दिल्लीत ऑपरेशन सिंदूरबाबत झालेल्या पत्रकार परिषदेचे नेतृत्त्व महिला अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी केले होते. त्यानंतर या दोन्ही महिला अधिकाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सोशल मीडियावर अनेक युजर्सनी कर्नल सोफिया कुरेशी आणि आयएएफ विंग कमांडर व्योमिका सिंग यांचे पत्रकार परिषदेसाठी कौतुक केले. “भारताने ऑपरेशन सिंदूर द्वारे पाकिस्तानला धडा शिकवल्यानंतर दोन वेगवेगळ्या धर्मांच्या दोन महिला अधिकारी देशाला संबोधित करण्यासाठी एकत्र येत आहेत. हीच एकता दहशतवाद्यांना तोडायची होती. मात्र, त्यांनी आपल्याला आणखी भक्कमपणे एकत्र आणले. भारतीय सशस्त्र दलांनी किती उत्तम संदेश दिला आहे, हे एक परिपूर्ण चित्र आहे”, असे एका युजरने म्हटले होते.