पीटीआय, नवी दिल्ली

पाकिस्तानातील दहशतवादाविरोधातील ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशाची बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळांवरून वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्याकडे एका शिष्टमंडळाचे नेतृत्व असले तरी त्यांचे नाव पक्षाने सुचविले नव्हते. काँग्रेसने सुचविलेल्या चार प्रतिनिधींची नावे नाकारून थरूर यांचे नाव जाहीर केल्याने केंद्र सरकार डावपेच खेळत आहे, अशी टीका काँग्रेसने केली.

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाईचा संदेश जागतिक स्तरावर देण्यासाठी आणि पाकिस्तानविरोधात राजनैतिक लढाई भक्कम करण्याच्या दृष्टीने सात जणांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय शिष्टमंडळांची घोषणा शनिवारी केंद्र सरकारने केली. परदेशात पाठवल्या जाणाऱ्या शिष्टमंडळांसाठी चार खासदारांची नावे सादर करण्यास केंद्र सरकारने सांगितले होते आणि पक्षाकडून आनंद शर्मा, गौरव गोगोई, सय्यद नसीर हुसेन आणि अमरिंदर सिंग राजा वँरिंग यांची नावे सुचविण्यात आली होती, असे काँग्रेसने सांगितले.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका केली. पक्षाशी सल्लामसलत  केल्याशिवाय सरकार शिष्टमंडळात खासदारांची नावे समाविष्ट करू शकत नाही. लोकशाही व्यवस्थेत खासदारांना एखाद्या अधिकृत शिष्टमंडळात समाविष्ट केले जाते, त्यावेळी खासदारांनाही पक्षाची संमती घ्यावी लागते, असे रमेश म्हणाले. ‘चार नावांची मागणी केल्यानंतर काँग्रेसने जी चार नावे दिली, त्यांचा विचार न करता वेगळेच नाव घोषित करण्यात आले. हा सरकारचा अप्रामाणिकपणा आणि खोडसाळपणा आहे,’ अशी टीका रमेश यांनी केली.

सरकारचे कौतुक भोवले?

गेल्या काही दिवसांपासून शशी थरूर हे केंद्रातील मोदी सरकारचे कौतुक करत आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’ हा पाकिस्तान आणि जगासाठी एक मजबूत संदेश आहे, असे सांगत थरूर यांनी सरकारच्या धोरणांचे कौतुक केले होते. त्यानंतर काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत थरूर यांनी लष्मणरेषा ओलांडली आहे, असा ठपका पक्षाने ठेवला होता. पंधरवड्यापूर्वी केरळमधील एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि थरूर एकाच मंचावर होते. त्यावेळी व्यासपीठावरील थरूर यांच्या उपस्थितीमुळे काही जणांचा तीळपापड होईल, असे विधान मोदींनी केले होते.

टीकेला भाजपचे प्रत्युत्तर :

 सरकारने शिष्टमंडळाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांची निवड सार्वजनिक जीवनात दीर्घकाळ काम करण्याचा अनुभव पाहूनच केल्याचे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले. थरूर यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप पाडणाऱ्या नेत्याचे नाव काँग्रेसने न सुचविल्याबद्दल भाजपने आश्चर्य व्यक्त केले. त्यांचे वक्तृत्व, संयुक्त राष्ट्रांत काम करण्याचा अनुभव आणि परराष्ट्र धोरणांबाबत सखोल ज्ञान कोणीही नाकारू शकत नाही. मग काँग्रेसने शिष्टमंडळांसाठी त्यांची शिफारस का केली नाही, असा सवाल भाजपने विचारला.

सुळे, शिंदे यांच्याकडे नेतृत्व

शिष्टमंडळांचे नेतृत्व सात विविध पक्षांचे नेते करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) खासदार श्रीकांत शिंदे यांचाही त्यात समावेश आहे.

रविशंकर प्रसाद (भाजप), बैजयंत पांडा (भाजप), शशी थरूर (काँग्रेस), संजयकुमार झा (संयुक्त जनता दल), कणिमोळी (द्रमुक) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळे विविध देशांना भेटी देणार आहेत.

प्रत्येक शिष्टमंडळात सहा ते सात खासदार आहेत. सुळेंच्या नेतृत्वाखालील पथक ओमान, केनिया, दक्षिण आफ्रिका आणि इजिप्तचा दौरा करणार आहे.

काँग्रेसमध्ये असणे आणि काँग्रेसचे असणे यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. सलमान खुर्शीद यांच्याशीही सरकारने संपर्क साधला होता. मात्र हा निर्णय पक्ष घेईल, असे त्यांनी ठाम सांगितले. काँग्रेस ही गंगेसारखी आहे, जिच्या अनेक उपनद्या आहेत… काही सुकतात आणि काही प्रदूषित होतात. जयराम रमेशकाँग्रेस सरचिटणीस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.