Seven Deat At Tamilnadu In Jallikattu : तामिळनाडूमध्ये जलीकट्टू दरम्यान एकाच दिवसात सात जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी पोंगल निमित्त तामिळनाडूतील विविध ठिकाणी जलीकट्टू स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान यामध्ये ४०० हून अधिक जण जखमीही झाले असल्याचे, तामिळनाडू पोलिसांनी आज सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांपैकी सहा जण स्पर्धा पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक होते. तर, एक मृत व्यक्ती जलीकट्टूमध्ये सहभागी झाला होता. शिवगंगा जिल्हा आणि पुडुकोट्टई येथे या दरम्यान दोन बैलांचाही मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी कन्नम पोंगलचा दिवस होता आणि या दिवशी सर्वाधिक जलीकट्टू खेळला जातो. पुडुकोट्टई, करूर आणि त्रिची जिल्ह्यांमध्ये झालेल्या जलीकट्टू कार्यक्रमांमध्ये एकूण १५६ लोक जखमी झाले. यामध्ये १७ बैल मालक आणि ३३ प्रेक्षक होते.

शिवगंगा जिल्ह्यात जलीकट्टू स्पर्धेत सहभागी झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर मदुराईमध्ये या स्पर्धेदरम्यान बैलाने एका प्रेक्षकाला जखमी केले होते. त्यानंतर त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. याशिवाय राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आणखी ५ जणांचा मृत्यू झाला आहे. या वर्षीची जलीकट्टूची पहिली स्पर्धा पुडुक्कोटाईच्या गंडारावकोट्टई परिसरात झाली होती. या मृत्यूंमुळे अलिकडच्या वाढलेल्या घटनांमुळे जलीकट्टूभोवतीच्या सुरक्षा उपायांवर पुन्हा वाद सुरू झाला आहे.

जलीकट्टू म्हणजे काय?

पोंगल सणादरम्यान खेळण्यात येणारा जलीकट्टू हा तामिळनाडूचा पारंपारिक खेळ आहे. जलीकट्टू या खेळाचा अर्थ आहे वळूंना वश करणे. या खेळाला २००० वर्षांची परंपरा आहे. तज्ज्ञांच्या मते जलीकटटू हे नाव या खेळाला त्याच्या वैशिष्ट्यामुळे पडले आहे. सल्ली कासू म्हणजे नाणी आणि कट्टू म्हणजे या नाण्यांचा संग्रह. एक पिशवी वळूच्या शिंगांना बांधली जाते. जेव्हा हे वळू पळतात तेव्हा त्यांच्या मागे युवक धावतात आणि त्यांच्या शिंगांना बांधलेली पिशवी काढून घेण्याचा प्रयत्न करतात. या खेळामध्ये जेलीकट या विशिष्ट जातीच्या वळूंचा वापर केला जातो म्हणून देखील या खेळाला जलीकट्टू हे नाव पडले आहे. शिंगांना पैसे बांधण्याव्यतिरिक्त खेळाडूंना मोठे बक्षीस देखील दिले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जलीकट्टू हा खेळ देशातील सर्वात धोकादायक खेळांपैकी एक मानला जातो. या खेळामुळे आतापर्यंत कित्येक लोक मृत्यूमुखी पडले आहेत तर अनेकांना अपंगत्वदेखील आले आहे. २०१० ते २०१४ दरम्यान या खेळामुळे १,१०० लोक गंभीरिरत्या जखमी झाले तर १७ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. गेल्या २० वर्षांमध्ये २०० पेक्षा अधिक लोक बळी पडले आहेत.