भारतीय सैन्याने ९-१० मे रोजीच्या रात्री रावळपिंडीसह हवाई दलाच्या अन्य तळांवर ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राद्वारे हल्ले करून पाकिस्तानचे नियोजित हल्ले उधळून लावल्याची कबुली पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अझरबैजानमधील लाचिन येथे दिली. पाकिस्तान-तुर्की-अझरबैजान त्रिपक्षीय शिखर परिषदेत ते बोलत होते. एवढेच नव्हे तर ज्यावेळी भारताच्या क्षेपणास्त्रांनी हल्ला केला, तेव्हा त्यांच्या सैन्याला माहितीही नसल्याचे ते म्हणाले.
असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी सैन्याने १० मे रोजी सकाळच्या नमाजानंतर भारतावर हल्ला करण्याची योजना आखली होती. तथापि, पहाटेच भारताने अनेक पाकिस्तानी लष्कराचे तळ तसेच महत्त्वाच्या ठिकाणी ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. आमच्या नियोजित हल्ल्यांची वेळ येण्यापूर्वीच, भारताने नूर खान (रावळपिंडी) आणि मुरीद (चकवाल) येथील तळ उद्ध्वस्त केले, असे शरीफ म्हणाले. दरम्यान, मुनीर यांनी त्यांना या हल्ल्याची माहिती सकाळीच दिली होती, असेही शरीफ म्हणाले. मुनीर यांना आता ‘फील्ड मार्शल’पदी बढती देण्यात आली आहे.
पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर
- पश्चिम सीमेवरील नागरी वस्त्यांवर पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केल्याच्या प्रत्युत्तरात रावळपिंडीतील नूर खान हवाई तळ हा भारताने लक्ष्य केलेल्या ११ लष्करी तळांपैकी एक होता.
- रावळपिंडीतील पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयापासून थोड्या अंतरावर असलेल्या या हवाई तळावर ‘लॉकहीड सी-१३० हरक्यूलिस’ आणि ‘इल्युशिन आयएल-७८ रिफ्युएलर’सारखी उच्च दर्जाची लष्करी विमाने आहेत.
- उपग्रह प्रतिमांच्या विश्लेषणावरून किमान दोन लष्करी वाहतूक वाहनांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट होते.
- नूर खानव्यतिरिक्त, भारताने रफिकी, मुरीद, रहीम यार खान, सुक्कुर आणि चुनियान येथील पाकिस्तानी लष्करी तळांवर हल्ला केला. स्कार्दू, भोलारी, जेकबाबाद आणि सरगोधा येथील हवाई तळांचे यात मोठे नुकसान झाले.
‘एसयू-३० एमकेआय’ विमानांचे अचूक हल्ले
भारताने हवाई तळांवर अचूक हल्ला करण्यासाठी ‘एसयू- ३० एमकेआय’ विमानांमधून सुमारे १५ ब्रह्मोस क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्याची पुष्टी उपग्रह प्रतिमांमार्फत झाली आहे. लष्करी तळांवर हल्ला करताना ‘फायर अँड फोरगेट’ क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानच्या चिनी-मूळ हवाई संरक्षण प्रणालींनाही खो दिला आहे. रशियाच्या सहकार्याने विकसित केलेली ही क्षेपणास्त्रे ३०० किमी अंतरापर्यंतचे लक्ष्य भेदण्यास सक्षम आहेत. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने सीमेवरील परिस्थिती आणखी बिकट केली होती. भारतीय शहरांवर हल्ल्यासाठी ड्रोन पाठविले खरे तथापि, हवाई संरक्षण प्रणाली ‘एस-४००’ आणि ‘आकाश’ यांनी त्यांचा वेध घेतला होता.