गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंबीय हे पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी सक्रिय झाले आहेत. पवार कुटुंबीय अनेक ठिकाणी प्रचार करताना दिसत आहेत कारण पराभवाच्या भीतीने त्यांना हे करावे लागते आहे अशी टीका विरोधाक श्रीरंग बारणे यांनी केली. ४० अंश तपमान असताना भर उन्हात पवार कुटुंबीय फिरत आहे याचा अर्थ त्यांचा पराभव निश्चित असल्याचं त्यांना समजलं आहे असंही बारणे म्हणाले. श्रीरंग बारणे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर बारणे यांनी पत्रकारांशी बोलताना ही टीका केली. खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ४० अंश तपमानात भर उन्हात पवार कुटुंबीय प्रचारासाठी रस्त्यावर उतरले आहे. याचाच अर्थ त्यांचा प्रभाव निश्चित वाटतो आहे अशी टीका बारणे यांनी पवार कुटुंबीयांवर केली आहे. कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये मोठा उत्साह होता. गेल्या पाच वर्षांपासून लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांशी जोडलो गेलेलो आहे. केंद्रातून अनेक योजना या मतदार संघात आणलेल्या आहेत. ही निवडून विकासाच्या आधारावरच लढवत आहोत असंही बारणेंनी म्हटलं आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी राष्ट्रवादीचे नेतृत्व नाकारले आहे. त्यांचा महानगर पालिकेच्या निवडणुकीत पराभव झालेला आहे.मावळ मतदार संघात राष्ट्रवादीचे प्राबल्य नाही.केवळ घराण्यातील व्यक्ती पुढे करून राष्ट्रवादी पक्ष निवडणूक लढवत आहे. या अगोदर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचा पराभव झालेला आहे. त्यांचं डिपॉझिट जप्त झाल्याची आठवण बारणे यांनी करून दिली.