Shubhanshu Shukla said india still looks saare Jahan se achcha : अंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेलेले भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला १५ जुलै रोजी पृथ्वीवर परतणार आहेत. ‘ॲक्सिओम-४’ या व्यावसायिक मोहिमेंतर्गत शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीर अंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (आयएसएस) गेले आहेत. हे चार अंतराळवीर सोमवार, १४ जुलै रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी ४.३५ वाजता आयएसएसवरून निघणार आहेत. मंगळवारी दुपारी ३ वाजता ते कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ उतरण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान परतीच्या प्रवासाला सुरूवात करण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी अंतराळातून एक संदेश दिला आहे. त्यांचा हा प्रवास अद्भूत होता असेही मिश्रा म्हणाले आहेत. या मोहिमेचा निरोप समारंभ नुकताच पार पडला ज्यामध्ये शुक्ला बोलत होते. “हा एक अविश्वसनीय प्रवास होता. या मोहिमेत सहभाग असलेल्या लोकांमुळे तो अद्भुत आणि अविश्वसनिय बनला,” असे शुक्ला त्यांच्या निरोपाच्या भाषणात म्हणाले.
शुभांशु शुक्ला त्यांच्या निरोपाच्या भाषणात पुढे हिंदीतून बोलताना म्हणाले की,- “माझा हा प्रवास कमालीचा राहिला आहे. पण आता माझा हा प्रवास संपणार आहे, पण तुमचा आणि माझा प्रवास अजून खूप दूरपर्यंत आहे. आपला ह्यूमन स्पेस मिशनचा प्रवास खूप लांबचा आणि कठीण देखील आहे. पण मी तुम्हाला खात्री देतो की आपण जर निश्चय केला तर ती शक्य आहे.”
आजचा भारत अंतराळातून कसा दिसतो?
शुक्ला यांच्यापूर्वी अंतराळात गेलेले पहिले अंतराळविर राकेश शर्मा यांनी अंतराळातून भारत कसा दिसतो या प्रश्नाचे उत्तर देताना ‘सारे जहाँ से अच्छा’ असं उत्तर दिलं होतं. त्या ओळींना शुक्ला यांनी पुन्हा एकदा उजाळा दिला आहे. शुक्ला म्हणाले की, “४१ वर्षांपूर्वी एक भारतीय अंतराळात गेले होते आणि त्यांनी आपल्याला सांगितले होते की वरून भारत कसा दिसतो. कुठेतरी आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं आहे की आज भारत कसा दिसतो, मी तुम्हाला सांगतो. आजचा भारत स्पेसमधून महत्वकांशी दिसतो, आजचा भारत निर्भीड दिसतो, आजचा भारत आत्मविश्वासाने भरलेला दिसतो, आजचा भारत अभिमानाने भरलेला दिसतो. याच सर्व कारणांमुळे मी पुन्हा एकदा म्हणू शकतो की आजचा भारत आजही ‘सारे जहाँ से अच्छा’ दिसतो. लवकरच जमिनीवर भेटू.”