दोन महिन्यांच्या विरामानंतर सोमवारी देशांतर्गत प्रवासी विमान सेवा सुरू झाली. मात्र, दिवसभरात दिल्लीतील ८२ विमानांसह विविध विमानतळांवरील ६३० विमानसेवा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे विमान प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ होता.

करोनासंदर्भातील नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रवाशांना विमानतळांवर प्रवेश दिला जात होता. दिल्लीतील फक्त टर्मिनल- तीनवरूनच विमानांचे उड्डाण होत होते व विमाने उतरवली जात होती. विमान उड्डाणाच्या किमान दोन तास विमानतळांवर येणे बंधनकारक असल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली होती. विमानतळावर पोहोचल्यानंतर अनेकांना विमान उड्डाण रद्द झाल्याचे समजत होते. या संदर्भात वेळेवर माहिती मिळत नसल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. पण दिवसभरात दिल्लीहून १२५ विमानांची विविध शहरांकडे उड्डाणे झाली, तर ११८ विमाने दिल्लीत उतरली. दिल्लीच्या टर्मिनल- तीनवरून पहिले विमान पहाटे पावणेपाच वाजता पुण्याकडे रवाना झाले.

दिल्लीच नव्हे तर मुंबईसह अन्य शहरांमधूनही विमाने रद्द करण्यात आली. एअर इंडियासह खासगी विमान कंपन्यांनीही देशांतर्गत सेवा सुरू केली असून इंडिगोच्या ८५ टक्के विमान फेऱ्या ठरलेल्या वेळेच्या कमी-अधिक तीस मिनिटांच्या फरकाने इच्छित विमानतळांवर पोहोचल्या. ३१ मेपर्यंत दररोज २०० विमान फेऱ्या केल्या जातील, असे कंपनीच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दिल्लीतून सोमवारी रद्द झालेल्या विमान फेऱ्या प्रामुख्याने पूर्व व ईशान्येकडील राज्यांमध्ये जाणाऱ्या होत्या. अ‍ॅम्फन वादळाचा तडाखा या भागांना बसला असून खराब हवामानामुळेही विमान फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे पश्चिम बंगाल व ओडिशाला जाणारी विमाने रद्द झाली. हवाई वाहतूक क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास ६३० विमाने रद्द करण्यात आली.

केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीप पुरी यांनी प्रवाशांचे विलगीकरण करण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त केले असले तरी वेगवेगळी राज्ये स्वतंत्रपणे विलगीकरणाचे नियम लागू करत आहेत. छत्तीसगड सरकारने लक्षणे नसलेल्या विमान प्रवाशांनाही १४ दिवस संस्थात्मक विलगीकरणाची सक्ती केली आहे. आसाम, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, हिमाचल, उत्तराखंड या राज्यांनीही प्रवाशांचे विलगीकरण करण्याचे ठरवले आहे.