Raja Raghuvanshi Murder Case Wife Sonam Arrested: गेल्या दोन आठवड्यांपासून इंदोरचं एक दाम्पत्य मेघालयमध्ये बेपत्ता झाल्याची चर्चा सुरू होती. २३ मे पासून सोनम रघुवंशी व राजा रघुवंशी बेपत्ता होते. २ जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला, पण सोनम अद्याप सापडली नव्हती. आता या प्रकरणी काही धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मेघालय पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार सोनम रघुवंशीनंच तिच्या पतीची हत्या केली असून त्यासाठी भाडोत्री हल्लेखोरांना सुपारी दिली होती. उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये सोनम विमनस्क अवस्थेत पोलिसांना सापडली आहे. पण पोलिसांच्या या दाव्यानंतर आता सोनमच्या वडिलांनी धक्कादायक आरोप केले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
११ मे रोजी सोनम व राजा रघुवंशी यांचा इंदोरमध्ये विवाह पार पडला. २० मे रोजी हे दोघे मधुचंद्रासाठी मेघालयला निघाले. गुवाहाटीला कामाख्या देवीच्या मंदिरात त्यांनी दर्शन घेतलं. २३ मे रोजी शिलाँगला जात असल्याचं कुटुंबीयांना फोनवर सांगून ते निघाले खरे, पण त्यानंतर त्यांच्याशी संपर्क पूर्णपणे तुटला. त्यांनी शिलाँगमध्ये भाड्याने घेतलेली एक अॅक्टिव्हा बाईकही पोलिसांना काही दिवसांनी सापडली. दोघांच्या शोधासाठी एसडीआरएफ, एनडीआरएफ, एसओटी व ड्रोनची मदत घेण्या आली.
२ जून रोजी वेई सॉडाँग धबधब्याजवळ एका मोठ्या खड्ड्यात पोलिसांना राजा रघुवंशीचा मृतदेह आढळला. पण सोनम अद्याप बेपत्ताच होती. अखेर रविवारी ८ जून रोजी संध्याकाळी सोनमनं स्वत:च आपल्या कुटुंबीयांना फोन करून आपण उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये एका ढाब्यावर असल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी सोनमला अटक केली. तसेच, तिने हत्येसाठी सुपारी दिलेल्या तीन हल्लेखोरांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
सोनमच्या वडिलांचे गंभीर आरोप
दरम्यान, सोनम स्वत: शरण आल्याचं पोलिसांनी सांगितलं असलं, तरी सोनमचे वडील देवी सिंह यांनी मात्र मुलीनं ही हत्या केली नसल्याची भूमिका मांडली आहे. यासह त्यांनी मेघालय पोलिसांवर गंभीर आरोप करतानाच तपासातील एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बोट ठेवलं आहे. सोनम व राजा रघुवंशीनं शिलाँगमध्ये भाड्याने घेतलेल्या स्कूटीमधील सामान राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला तिथपर्यंत कसं पोहोचलं? असा सवाल देवी सिंह यांनी केला आहे.
“सर्व आरोप १०० टक्के खोटे आहेत. तिथले पोलीस विकले गेले आहेत. गुंडांशी संगनमत करून तिथले पोलीस काम करतात. जर या प्रकरणाची व्यवस्थित चौकशी झाली तर तिथलं आख्खं पोलीस स्थानक सस्पेंड होईल. आमची मागणी आहे की तिथे सीबीआय पाठवून चौकशी केली जावी. जी अॅक्टिव्हा त्या दोघांनी घेतली होती, त्यात दोघांचं सामान ठेवलं होतं. ते सगळं सामान राजा रघुवंशीच्या मृतदेहाजवळ कसं पोहोचलं हे तिथल्या पोलिसांना विचारलं जायला हवं”, असा मुद्दा देवी सिंह यांनी उपस्थित केला आहे.
सोनमची आई म्हणते, “तपासातून सगळं समोर येईल”
दरम्यान, एकीकडे सोनमच्या वडिलांनी संतप्त प्रतिक्रिया दिलेली असताना सोनमच्या आईनं तपासावर भरवसा दाखवला आहे. “हे आरोप निराधार आहेत. जोपर्यंत तपास होत नाही, तोपर्यंत मी काहीही बोलू शकत नाही. असं तर नाही ना की मी म्हटलं की माझी मुलगी चांगली आहे तर ती चांगली ठरेल आणि मी म्हणाले वाईट आहे तर वाईट ठरेल. तपास झाल्यावर त्यात सगळं समोर येईल”, असं त्या म्हणाल्या.