नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकांमधील दारुण पराभवातून धडा घेत, काँग्रेस पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागला असून राज्या-राज्यांतील उमेदवारांची लवकरात लवकर निवड केली जाईल. त्यासाठी आठवडय़ाभरात छाननी समिती स्थापन केली जाणार असून एक-दोन दिवसांमध्ये जाहीरनामा समितीचीही घोषणा केली जाईल. दोन दिवसांपूर्वी दिल्लीत ‘इंडिया’ महाआघाडीच्या झालेल्या बैठकीतही प्रामुख्याने जागावाटपांच्या मुद्दय़ावर चर्चा झाली होती. इंडियातील घटक पक्षांशी जागावाटपाचा प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रीय स्तर पाच सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. ही समिती प्रादेशिक पक्षांशी जागावाटपाच्या वाटाघाटी करेल. त्याआधी ही समिती राज्यस्तरीय नेत्यांशी चर्चा करून जागावाटपातील काँग्रेसचा दावा निश्चित करेल. दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड आदी राज्यांमध्ये काँग्रेसला समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष तसेच, डाव्या पक्षांशी बोलणी करावी लागणार आहेत. तृणमूल काँग्रेससह अन्य पक्षांनीही जागावाटपासंदर्भात डिसेंबर अखेरची मुदत दिल्यामुळे काँग्रेसनेही जागावाटप व उमेदवार निवडीला गती दिली असून इंडियाच्या जागावाटपासंदर्भात जानेवारीच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. हेही वाचा >>>आजारी भावाला बहिणीने किडनी दिली; रागवलेल्या पतीने व्हॉट्सॲप वरून दिला ‘तिहेरी तलाक’ काँग्रेसच्या मुख्यालयात गुरुवारी झालेल्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये सदस्यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग देण्याचा आदेश पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी दिले. चार तास झालेल्या बैठकीमध्ये ७० सदस्यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीच्या पराभवाची मीमांसा करण्यात आल्याची माहिती संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी दिली. चांगल्या निकालांची अपेक्षा असताना पराभव झाल्याची कबुली वेणुगोपाल यांनी दिली असली तरी, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ या तीनही राज्यांमध्ये मतांची टक्केवारी कायम राखली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात काँग्रेसला तगडी लढत देता येईल, असा दावा वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषदेत केला. बेरोजगारी, महिला आरक्षणाची अंमलबजावणी, ओबीस महिलांना आरक्षणात कोटा आदी मुद्दे लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे प्रमुख मुद्दे असतील, असे खरगे यांनी बैठकीत स्पष्ट केले. ‘है तय्यार हम’चा नारा काँग्रेसच्या स्थापनादिनी, २८ डिसेंबर रोजी नागपूरमध्ये ‘है तय्यार हम’चा नारा देत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली जाणार आहे. या सभेला १० लाखांची गर्दी अपेक्षित असून सोनिया गांधी, राहुल गांधींसह पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित राहतील, अशी माहिती वेणुगोपाल यांनी दिली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा आयोजित केला जाणार असून पूर्व-पश्चिम यात्रेची तात्काळ आखणी केली जाईल, असेही वेणुगोपाल यांनी सांगितले.