Maha Kumbh 2025 Mauni Amavasya : महाकुंभ येथील संगम घाटावर बुधवारी पहाटे संगम येथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने या पवित्र सोहळ्याला गालबोट लागलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत दिलं आहे. मौनी अमावस्येला पवित्र स्नानासाठी मोठ्या संख्येने भाविक जमल्यानंतर ही घटना घडली.

मेळ्यातील विशेष कर्तव्यावरील अधिकारी आकांक्षा राणा यांनी सांगितले की, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संगम घाटावरील बॅरिकेट्स तुटल्याने काही लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची नेमकी संख्या अद्याप आमच्याकडे नाही”, असे राणा यांनी पीटीआयला सांगितले.

घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल करण्यात आल्या असून जखमींना कुंभच्या सेक्टर २ मधील तात्पुरत्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. चेंगराचेंगरीनंतर आजचे अमृत स्नान रद्द करण्यात आल्याचे आखाडा परिषदेने जाहीर केले. अधिकाऱ्यांनी भाविकांना संगमात स्नान केल्यानंतर जागा रिकामी करण्याचे आवाहन केले. तसंच, संगम घाटावर जाऊन स्नान न करण्याचे आवाहन करण्यात आले असून नजिकच्या इतर घाटावर जाऊन स्नान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जखमी लोकांच्या संख्येची अद्याप माहिती मिळाली नसली तरीही इंडिया टुडेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किमान ३० ते ४० भाविक जखमी आहेत. “आम्ही दोन बसमध्ये ६० जणांच्या तुकडीत आलो. आम्ही नऊ जणांच्या ग्रुपमध्ये होतो. अचानक गर्दीत धक्काबुक्की झाली आणि आम्ही अडकलो. आमच्यापैकी बरेच जण खाली पडले आणि गर्दी अनियंत्रित झाली”, कर्नाटकातील सरोजिनी यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधून मदतीचे आवाहन केले आहे. तर, केंद्रीय गृहमंत्री यांनीही योगी आदित्यनाथ यांच्याशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काय म्हणाले?

योगी आदित्यनाथ म्हणाले, संगम घाटावर मोठ्या प्रमाणात भाविक एकत्र आल्याने चेंगराचेंगरी झाली. पण घटनास्थळी प्रशासन सज्ज आहे. रात्री १ ते दोन वाजताच्या दरम्यान आखाडा मार्गावर अमृत स्नानासाठी भाविक जमले होते. तेथे बॅरिकेट्स लावण्यात आले होते. त्यावेळी बॅरिकेट्स निघाल्याने भाविक गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सातत्याने प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मंगळवारी सायंकाळी ६ वाजल्यापासूनच घाटावर गर्दी वाढत गेली.

पोलिसांनी चेंगराचेंगरीचा दावा फेटाळला

“येथे चेंगराचेंगरी झालीच नाही. भाविकांची संख्या अधिक झाल्याने काहीजण जखमी झाले आहेत. सध्या स्थिती नियंत्रणात आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. घाट सुरू करण्यात आले आहेत, तिथे स्नान करून सुरक्षितरित्या आपल्या घरी पोहोचा. अमृतस्नानही लवकरच सुरू होणार आहे”, SSP राजेश द्विवेदी म्हणाले.

मोदींनी मृतांना वाहिली श्रद्धांजली

या घटनेतील जखमी वा मृतांची अधिकृत संख्या समोर आलेली नसली तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर म्हटलंय की, “प्रयागराज येथील महाकुंभ येथे झालेला अपघात दुखद आहे. यात ज्या भाविकांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे त्यांच्याप्रती माझ्या संवेदना आहेत.तसंच, जे भाविक गंभीर जखमी झाले आहेत, त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी मी प्रार्थना करतो. पीडितांना मदत करण्यासाठी स्थानिक प्रशासन सज्ज आहेत. या प्रकरणी मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली असून मी राज्य सरकारच्या संपर्कात आहे.”

बुधवारी मौनी अमावस्येच्या मुहूर्तावर प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर १० कोटींहून अधिक भाविक पवित्र स्नान करतील अशी अपेक्षा होती. मौनी अमावस्या हा भक्तांसाठी गंगेत पवित्र स्नान करण्याचा सर्वात शुभ दिवस म्हणून ओळखला जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या विशेष दिवसापूर्वी, उत्तर प्रदेश सरकारने वाहने नसलेले झोन आणि क्षेत्रनिहाय निर्बंधांसह कडक गर्दी नियंत्रण उपाय लागू केले होते. कार्यक्रमादरम्यान भाविकांची सुरळीत आणि शिस्तबद्ध हालचाल सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने या उपाययोजना करण्यात आल्या. संगम आणि घाटावरील दृश्यांमध्ये हजारो भाविक गंगेत पवित्र स्नान करण्यासाठी जमलेले दिसत होते.