नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळय़ाबाबत आवाज उठवल्याचा दावा करणाऱ्या एका डॉक्टरला आंदोलनातील हिंसाचारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. मध्य प्रदेशात निदर्शनांदरम्यान हा कथित हिंसाचार झाल्याचा आरोप आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्या. पी. एस. नरसिंहा यांच्या पीठापुढे ही सुनावणी झाली. ज्येष्ठ वकील कपिल सिबल आणि विवेक तन्खा यांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपी आनंद राय हे नेत्ररोगतज्ज्ञ आहेत. ते गेले ६० दिवस तुरुंगात आहेत. जिल्हाधिकाऱ्यावर ज्या जमावाने हल्ला केला, त्यात रायसुद्धा होते, असा आरोप आहे. त्यांच्यावर भारतीय दंड विधानाची विविध कलमे तसेच अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याखाली गुन्हे दाखल आहेत. मध्य प्रदेश सरकारची बाजू मांडणारे महान्याय अभिकर्ता तुषार मेहता यांना उद्देशून न्यायालयाने विचारणा केली की, व्यापम घोटाळय़ात आपण जागल्याची भूमिका पार पाडल्याचा आरोपीचा दावा आहे. तो हिंसक जमावात सामील होता असा आरोप आहे. त्याला तुम्ही किती काळ तुरुंगात ठेवणार आहात? या प्रकरणात राय यांच्याविरोधात पोलिसांनी आरोपपत्रही दाखल केलेले नाही. याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने अटीसापेक्ष राय यांना जामीन मंजूर केला.