Supreme Court भारतीय न्याय संहितेतील कलम ४९८ जे कलम घरगुती हिंसाचाराच्या घटनेच्या प्रकरणांशी संबंधित आहे, या कलमाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालाने फेटाळली आहे. या कलमाचा काही वेळा दुरुपयोग केला जातो ही बाब जरी खरी असली तरीही हा हे कलम रद्द करण्याचा आधार असू शकत नाही. घरगुती हिंसाचाराची जी प्रकरणं न्यायालयात आली आहेत त्यामध्ये वास्तविक हिंसाचाराची प्रकरणंही नमूद आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं आहे?
कलम ४९८ अ चा दुरुपयोग केला जाऊ शकतो यावर आमचं वैचारिक मंथन मोठ्या प्रमाणात झालं. मात्र जी प्रकरणं दुरुपयोगाची आहेत त्या प्रकरणातही वास्तवात हिंसाचार झाला आहे. तसंच घरगुती हिंसाचाराची अशी अनेक प्रकरणं आहेत ज्यामध्ये कलम ४९८ ने पीडित महिलांना सुरक्षा आणि न्याय देण्याचं काम केलं आहे. न्यायालयाला हे माहीत आहे की काही अविचारी लोक या कलमाचा फायदा घेतात. हुंडा घेतला जातो आहे वगैरे दाखवत तो व्हिडीओ व्हायरल करतात. मात्र अशा प्रकरणांमध्येही हिंसा घडल्याचं दिसून आलं आहे.
हुंडा हा आपल्या देशात पडलेला चुकीचा पायंडा आहे-सर्वोच्च न्यायालय
समाजातील कटू सत्य हे आहे की हुंडा देणं आणि घेणं हा एक प्रकारचा चुकीचा पायंडा समाजात पडला आहे. अशा अनेक प्रकरणांमध्ये कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही. तसंच महिला मूकपणे अन्याय सहन करत राहतात. अशा प्रकरणांमध्ये कलम ४९८ अ आवश्यक आहे कारण अशा घटकांना न्याय देण्याचं काम करतात. जनश्रुती नावाच्या एका संघटनेने जनहित याचिका दाखल केली होती आणि ४९८ अ हे कलम लावण्याआधी त्या प्रकरणाचा पडताळा झाला पाहिजे तसंच खोट्या प्रकरणांना संरक्षण द्यायला नको अशा मागण्या करत याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका सर्वोच्च न्यायालाने फेटाळली आहे. Live Law ने हे वृत्त दिलं आहे.
कलमाचा दुरुपयोग होतो म्हणून ते रद्द करणं योग्य ठरणार नाही-सर्वोच्च न्यायालय
कलम ४९८ अ या कलमाचा दुरुपयोग होतो ही बाब मान्य आहे, त्यापासून सावध राहिलं पाहिजे. पण दुरुपयोग होतो म्हणून या कलमाचं महत्त्व कमी होत नाही. काही प्रकरणांमध्ये हे कलम बेईमानीने वापरलं गेलं आहे. अशा प्रकरणांबाबत न्यायालयाने योग्य ते निर्देश दिले आहेत. मगरीच्या आसवां सारखा या कलमाचा उपयोग होऊ नये. ज्या प्रकरणात या कलमाचा दुरुपयोग झाला आहे त्यावर चर्चा होऊन योग्य ती पुढील कारवाई केली गेली पाहिजे. पण हे कलम रद्द करणं किंवा यामध्ये खोटी प्रकरणं येतात म्हणून हे कलम महत्त्वाचं नाही असं म्हणता येणार नाही.