बिल व मेलिंडा गेटस फाउंडेशनचा ग्लोबल गोलकीपर पुरस्कार प्रदान न्यूयॉर्क : स्वच्छ भारत मोहिमेमुळे संयुक्त राष्ट्रांनी निर्धारित केलेली उद्दिष्टे व लक्ष्ये साधण्यात भारताला फायदा झाला असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. बिल व मेलिंडा गेटस फाउंडेशनचा ग्लोबल गोलकीपर पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला असता ते बोलत होते. ते म्हणाले की, स्वच्छता अभियानामुळे भारताला संयुक्त राष्ट्रांची उद्दिष्टे साध्य करण्यात मोठी मदत झाली. म.गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार मिळाला हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. १३० कोटी लोकांनी जर एखादे ध्येय ठरवले त्यासाठी शपथ घेतली तर कुठलेही आव्हान पार पाडता येते हे स्वच्छता अभियानातून आम्ही सिद्ध केले आहे. स्वच्छ भारत अभियानाचे यश हे कुठल्याही आकडेवारीच्या पलीकडे आहे. देशातील लोकांनी यात मोठी भूमिका पार पाडली आहे. त्यामुळे हा सन्मान त्यांचाही आहे. स्वच्छ भारत अभियान मोहिमेचे जनचळवळीत रूपांतर करणाऱ्या लोकांचे हे यश आहे, त्यांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात स्वच्छतेला प्राधान्य दिले. दुसऱ्या कुठल्याही देशात अशी मोहीम पूर्वी झाल्याचे ऐकिवात नाही. ही मोहीम सरकारने सुरू केली असली तर नंतर लोकांनीच ती पुढे नेली. गेल्या पाच वर्षांत देशात अकरा कोटी स्वच्छतागृहे बांधण्यात आली. तो एक विक्रम आहे. या मोहिमेचा फायदा गरीब व महिला यांना जास्त प्रमाणात झाला. स्वच्छतागृहे नसल्याने मुली शिक्षण सोडून देत होत्या आता हे थांबत आहे. कार्यक्रमानंतर मोदी यांनी मेलिंडा गेट्स व बिल गेट्स यांची भेट घेतली. गेट्स फाउंडेशनच्या अहवालातही ग्रामीण स्वच्छतेमुळे मुलांमधील हृदयाच्या समस्या सुटण्यास मदत झाली, महिलांमध्ये बॉडी मास इंडेक्स सुधारला हे मान्य करण्यात आल्याकडे मोदी यांनी लक्ष वेधले. महात्मा गांधीचा स्वच्छतेचा संदेश हा स्वातंत्र्यापेक्षाही जास्त महत्त्वाचा होता असे मत त्यांनी व्यक्त केले.