राजस्थानात स्वाइन फ्लूमुळे आणखी पाच जणांचा बळी गेला असून या वर्षांतील मृतांची संख्या ७३ झाली आहे, असे राज्य वैद्यकीय व आरोग्य विभागाने सांगितले. अजमेर, बारमेर, जोधपूर, बन्सवारा व चितोडगड या जिल्ह्य़ात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाल्याचे जिल्हा आरोग्य विभागाचे संचालक बी.आर.मीणा यांनी सांगितले. स्वाइन फ्लूची लागण ४९७ जणांना झाली असून १ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान ७३ जणांचा मृत्यू झाला आहे, असे सांगण्यात आले.
वैद्यकीय व आरोग्य खात्याचे मुख्य सचिव मुकेश शर्मा यांनी सांगितले, की विभागाने घरोघरी जाऊन सर्वेक्षण व जागरूकता मोहीम सुरू केली आहे. विशेष करून ग्रामीण भागात ही मोहीम राबवली जात आहे. मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली असून राज्यात स्वाइन फ्लूची स्थिती हाताळण्यासाठी विशेष कामगिरी दले स्थापन करण्यास सांगितले आहे. स्वाइन फ्लूचा प्रसार राजस्थानात वाढतच असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.